Saturday 13 March 2010

दूत: जी.ए.कुलकर्णी


चौकातील एका बाजूला विशाल प्रासाद होता व त्याला सात गोपुरे होती. प्रवेशद्वारी दोन्ही बाजूस, सुवर्णालंकार असलेले, विस्तृत गंड स्थलावर स्वस्तिक चिन्हे असलेले भव्य हत्ती सुखासिणपणे डोलत होते व त्या त्या हालचालीने त्यांच्या गजघंटिका लयबद्ध मंद स्वर निर्माण करीत होत्या. त्यामुळे आता निर्माण झालेल्या शांततेवर त्यांच्या सुरांची सौम्य कलाकुसर होत असल्याचा भास होत होता प्रसादासामोरच दुसऱ्या बाजूला आर्यस्थविरांचा मठ होता व त्याचे प्रवेशद्वार आठ पुरुष उंचीचे होते. त्यातून आतल्या बाजूला पायऱ्यांचा एक प्रवाह वर गेल्याप्रमाणे अनेक शुभ्र संगमरवरी पायऱ्या होत्या व तेथील कोरीव स्तंभाशेजारी केशरवस्त्रधारी दोन भिक्षु शीलाकृतीप्रमाणे स्तब्ध उभे होते. त्यांच्या मागे मठाच्या वर्तुळाकार सज्जात निरव शांतता होती व त्यावर एखादा भिक्षु फुलाच्या शुष्क पाकळीप्रमाणे संथपणे सरकताना दिसे.
नेहमीची प्रौढ, समययोग्य वृत्ती सोडून दूत त्वरेने रथातून उतरला व त्याच्या सेवकाने तुतारीचा नाद केला .या ध्वनीमुळे निद्रेतून अकस्मात जागा झाल्याप्रमाणे प्रासाद कोलाहलाने भरून गेला व त्यात गजघंटीकेचा मधुर नाद लाटेने उचललेल्या शिपल्याप्रमाणे नाहीसा झाला.प्रासादातील प्रांगणात रक्तवर्ण वस्त्रातील प्रतीहारींचा समुदाय दोन्ही बाजूना नम्रपणे उभा राहिला. सुवर्णवस्त्रात झगझगीत वाटणारी राजपुत्राची आकृती शांतपणे पायऱ्या उतरू लागली व प्रसादाच्या प्रवेशद्वारी येऊन थांबली. मठातील आवारातदेखील इतस्तत: फिरणाऱ्या शुष्क पाकळ्या एकत्र येऊन त्यांची माला झाल्याप्रमाणे अनेक भिक्षु एकत्र आले. आर्यस्थविरांच्या रेशमी, शिथिल वस्त्रातील आकृती खाली येऊ लागताच त्यांचे अनुयायीही त्याच आदरशील गतीने त्यांच्या मागोमाग येऊ लागले. वस्त्राच्या पुढील भागावर प्रज्वलित स्थडीलाचे चिन्ह असलेल्या एका भिक्षूच्या हातात कमल शिखर अधिकारदंड होता व दुसऱ्या भिक्षूने त्यांच्यावर रेशमी केशरी वस्त्राचे सुवर्णछत्र धरले होते.
या साऱ्या जनसमुदायाची दृष्टी आपल्यावर खिळली आहे, या कल्पनेनं दूतास अत्यंत समाधान वाटले व त्याची वृद्ध मुद्रा संतोषाने उजळली. तो किंचित गर्वाने पुढे झाला व त्याने राजपुत्र व आर्यस्थविर यांच्याकडे पहात औपचारिक, अनुभवी अभ्वादन केले. तो म्हणाला, "राजन, धर्मभूषण, सम्राटांचा विशेष दूत म्हणून मी आज येथे आलो आहे व सम्राटांची आज्ञा या जनसमुदायापुढे प्रकट करण्याचे भाग्य मला आज लाभत आहे. सम्राट मृगयेसाठी गेले असता कमल सरोवराकाठी शैलेश्वराच्या मंदिराजवळ त्यांना एक विलक्षण साक्षात्कार झाला व त्यांनी अत्यंत त्वरेने या सेवकास येथे पाठवले. मृगया अपूर्ण ठेवून स्वतः सम्राट प्रार्थना व चिंतन यासाठी अज्ञातस्थळी गेले आहेत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे घटना तात्काळ घडावी म्हणून त्यांनी पत्रिका, राजमुद्रा इत्यादी उपचारात एक क्षणही वेचला नाही, व मीही दोन दिवस अन्ननिद्रेचा विचार न करता या ठिकाणी प्राप्त झालो आहे. या आज्ञेचे स्वरूप सार्वजनिक आहे व ती सफल करण्यास कोणत्याही स्वामिनिष्ठ नागरिकास अधिकार आहे. कारण प्रत्येकाचे जीवन त्यावर अवलंबून आहे. सम्राटांची आज्ञा अशी आहे__"
त्या जनसमुदायात विलक्षण शांतता पसरली. राजपुत्राचे एक पाऊल नकळत पुढे पडले. आर्यस्थविरांनी एकमेकात गुंतवलेली बोटे उलगडली, व पुन्हा गुंतवली. हत्तींच्या गजघंटिकाचा नाद पुन्हा स्पष्ट होऊ लागताच, दोन प्रतिहारिनी त्यांच्यावर हात ठेवला व त्यांना मूक केले.
"त्यांची आज्ञा अशी आहे-" दूताने पुन्हा शब्द उच्चारले; परंतु त्याचा कंठ एकदम रुद्ध झालं व त्याचे शब्द स्पष्ट होईनात. त्याच्या डोळ्यासमोर एक पटल पसरल्याप्रमाणे झाले व अंग आतून बधीर होत आल्याप्रमाणे शुन्यपणे समोर पाहत तो स्तंभाप्रमाणे उभा राहिला. काही क्षण तसेच व्यर्थ जाताच जनांत अस्वस्थता पसरली व राजपुत्राच्या कपाळावर अधिरतेची सूक्ष्म अढी दिसू लागली. रेशमी वस्त्राआड लपलेली आर्यस्थविरांची बोटे उद्वेगाने तेथल्या तेथेच वरखाली होऊ लागली. दूताचे ओठ सारखे निष्फळपणे थरथरू लागले होते व त्याचा वृद्ध चेहरा असहाय, आर्त दिसू लागला होता. राजपुत्रसन्निध असलेल्या अमात्यांनी त्यास हलक्या स्वरात सूचना दिली. राजपुत्र दुताशेजारी आला व स्मित करत त्याने म्हटले, "दूता, तुमच्यावर अद्याप प्रवासाचा शीण आहे; आपल्या कार्याच्या महत्वाचा ताण आहे. परंतु तुम्ही आणलेल्या सम्राटांच्या आज्ञेची मला कल्पना आहे. आपल्या उत्तराधिकाराची योग्य व्यवस्था करावी अशी सम्राटांची फार दिवसांची इच्छा होती. मीच ते अधिकारपद स्वीकारावे अशी ती सम्राटांची आज्ञा असावी-"
तोपर्यंत आर्यस्थवीरही आपला दंडधारी सेवक व दोन अनुयायी यांच्यासह तेथे आले. आर्यस्थाविरांचा चेहरा पातळगूढ दिसत होता व ओठ आवळून धरल्याने त्यांची रेषा रेखीव धारदार वाटत होती.
"राजन, दूताने आणलेली आज्ञा तशी असणे अशक्य नाही." ते म्हणाले.
"सम्राटांवर धर्मपालानाचीदेखील महान पवित्र अशी जबाबदारी आहे. एका सप्ताहापूर्वीच मला त्यांच्या भेटीचा आनंद प्राप्त झाला होता, त्या वेळी याच विचाराने त्यांची मन:शांती ढळली होती. जर तसाच प्रसंग निर्माण झाला, तर धर्मशासनाची धुरा स्वीकारण्याचे मी त्यांना वाचन दिले, तेंव्हा त्यांच्या मुद्रेवर आनंदच नव्हे, तर कृतज्ञताही दिसली होती. कदाचित त्या संभाषणाची स्मृती होऊन मृगया अपूर्ण ठेऊन त्यांनी दुताकडून हीच आज्ञा पाठवली असेल."
राजपुत्राने त्यास उपरोधाने नम्र अभिवादन केले व म्हटले, "धर्मशासनाचे कार्य अतिपवित्र यात संदेह नाही, पण त्याबाबतचा निर्णय उत्तराधिकाराची निश्चितता झाल्यावरच अर्थपूर्ण होईल. राज्यशासक नसता धर्मव्यवस्था कदापि शक्य आहे का?"
आर्यस्थविरांच्या मुद्रेवर संतापाची किंचित छटा दिसली व त्यांचे ओठ जास्त रेखीव झाले. पण लगेच त्यांचा स्वर धूर्तपणे सौम्य झाला व ते म्हणाले, "आपले शब्द अयोग्य आहेत असे कोण म्हणेल? परंतु सम्राट अद्याप अधिकारपदावर आहेत. तेंव्हा त्याबाबतचा निर्णय त्यांच्या सूज्ञतेवर सोपवणे अनुरूप होणार नाही का?"
दूताच्या मनातील बधिरता झाली नाही, पण त्याचे ओठ हलले व शब्द उमटले, "या दासाला क्षमा असावी. माझी स्मृती आकस्मात निर्जीव, जड झाली आहे; सम्राटांची काय आज्ञा आहे, याचे मला पूर्ण विस्मरण झाले आहे; परंतु ती आज्ञा उत्तराधिकाराविषयी नव्हती, याचा मला पूर्ण विश्वास आहे. तशा स्वरूपाची आज्ञा नगरीतून राज्यमुद्रांकित आली असती व त्या वेळी दूताचा ध्वज श्वेतवस्त्रावर खड्गचिन्ह असा झाला असता."
त्याच्या शब्दांनी राजपुत्राचा चेहरा निस्तेज झाला, व आर्यस्थविरांचे ओठ किंचितसे विलगले. पण दूत पुढे म्हणाला, "आणि मला ती आज्ञा धर्मशासनाविषयीदेखील. त्या आज्ञा नेणारे दूत स्वतंत्र आहेत व त्यांच्या ध्वजवर कमंडलूचे चिन्ह असते. हे दोन्ही दूत सन्निध असता सम्राटांनी माझी निवड केली होती.'
"दूता, कदाचित शीघ्र प्रवासाचा शीण नाहीसा झाल्यावर तुमच्या स्मृतीला उजाळा येईल; व आम्हाला सम्राटांची आज्ञा श्रवन करता येईल; तेंव्हा तोपर्यंत प्रासादात तुम्ही आमचे स्वागत स्वीकारल्यास आम्हाला कृतज्ञ वाटेल." आमात्यांनी राजपुत्राकडे पाहत सुचवले. राजपुत्रास अमात्यांच्या चातुर्याचे कौतुक वाटले व त्याने हर्षाने दोन प्रतिहारीस खूण केली.
"हा अमात्यांचा विचार स्तुत्य आहे." आर्यस्थविरानी म्हटले. "या कार्यात आमचीही सहकार्याची नम्र इच्छा आहे." ते एका रुंद, निर्विकार चेहऱ्याच्या भिक्षुकडे वळले व म्हणाले, "भद्रानंद, तू दुतासह राजनच्या प्रासादात जा व त्यांच्या सन्निध रात्रंदिवस राहून राजनना आपली नम्र सेवा अर्पण कर."
मूळ वस्तूपासून छाया सुटल्याप्रमाणे भद्रानंद आर्यस्थविरांपासून निघाला व संथ पावले टाकत दूताजवळ उभा राहिला. पराभूत झाल्यामुळे राजपुत्राचा चेहरा संतप्त झाला. व त्याच्या तोंडून शब्द निघणार, तोच अमात्यांनी त्यास हलकाच स्पर्श केला व त्याने संयम पाळला. एका जागी खिळल्याप्रमाणे झालेल्या दूतास प्रतीहारीनी हलवले व त्याचे हात धरून ते भद्रनंदासह प्रासादात आले.
प्रासादात दूतास एका मृदू आसनावर बसवण्यात आले. भद्रानंदाने एका बाजूस आपले वस्त्र पसरले व तो तेथील अनेक शिल्पकृतीपैकीच एक असल्याप्रमाणे निश्चल बसून राहिला. दूताच्या स्नानासाठी सुगंधी उष्णजलाची सज्जता झाली. एका युवतीने त्याच्यासाठी मृदू, विलासी शय्या मांडली व ती नम्रपणे सेवेसाठी उभी राहिली. दूतासमोर वेदिकेवर विविध पक्वान्नांची पात्रे मांडण्यात आली, व त्याच्या सुखात काही न्यून रौ नये, अशी राजपुत्राने सर्वास आज्ञा दिली.
परंतु अदृश्य आघात झाल्याप्रमाणे दूत विकलपणे बसून राहिला. संध्याकाळ झाली, अंधार जमला, रत्नजडीत दीप प्रकाशित होऊन सकाळच्या प्रकाशात निस्तेज होऊन विझून गेले, परंतु दूताला निद्रेने स्पर्श केला नाही. राजपुत्र आपल्या शयनागारात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रतिहारी दूताजवळ येऊन जात असे. परंतु प्रत्येकवेळी त्याच्याकडून तेच उत्तर ऐकून राजपुत्राला अतिक्रोध आला, आणि सूर्याचे किरण आत उतरून संगमरवरी चित्रमालेवर पसरताच तो अमात्यांसह दूतासमोर येऊन उभा राहिला.
"कांही क्षणात जर तुला सम्राटांच्या आज्ञेची स्मृती झाली नाही, तर मी स्वहस्ते तुझा शिरच्छेद करीन!" तो संतप्तपणे म्हणाला. त्याच्या शब्दांनी भद्रानंदाच्या निर्विकार चेहऱ्यावर सजीवतेची खूण दिसली.
अमात्य त्याला उद्देशून म्हणाले, "राजवंशीयांनी सार्वजनिक स्थळी क्रोध प्रकट करू नये, असा राजनीतीचा दंडक आहे. आपण शांत व्हावे."
"परंतु अमात्य, हे सार्वजनिक स्थळ नाही; हा माझा प्रासाद आहे, हे माझे निवासस्थान आहे!"
"ते सत्य असेल, पण या क्षणी नाही!" भद्रानंदाकडे सूचक दृष्टीने पहात अमात्य म्हणाले," एका परक्याच्या स्पर्शाने शय्यागृहाचे वेश्यागार होते आणि मूर्तीची मृत्तिका होते, हे वचन तुम्हास अज्ञात नाही. आता दूताच्या बाबतीत मात्र आपण अन्य मार्ग शोधला पाहिजे. अनुनयाने असाध्य झालेले कार्य अनेकदा आक्रमणाने सहजसाध्य ठरते."
अमात्यांनी प्रतीहारीस आज्ञा दिली. काही वेळाने एका प्रतीहारीबरोबर चेहऱ्यासह सर्वांग काळ्या वस्त्राने झाकलेला एक उंच, बलवान मनुष्य आत आला. त्याच्या हातात तीन विविध तेजस्वी शस्त्रे होती. त्याच्या आगमनाने सर्वत्रच छाया पडल्याप्रमाणे झाले, व भद्रानंदही तत्काळ उभा राहिला. "राजदूत, आपण आणलेली सम्राटांची आज्ञा नि:संशय राजपुत्राविषयीच आहे. मात्र ती तुम्हाला या क्षणी आठवत नाही इतकेच." अत्यंत सौम्य पण कुटील स्वरात अमात्य म्हणाले, "ती स्मृती जागी व्हावी याच हेतूने मी आपणास सहाय्य करत आहे. हा या नगरातला डोंब आहे व तो आपल्या व्यवसायात अत्यंत निष्णात आहे. मनुष्याच्या अंगावरील त्वचा सोलण्याचे त्याचे कौशल्य तर अद्वितीय आहे. त्याला तुमच्यावर किंचित कौशल्य दाखवण्याची आज्ञा आम्ही दिली आहे."
सर्वत्र भीतीची एक लाट स्पर्शून गेली. परंतु दूत मात्र या साऱ्याशी आपला काहीच संबंध नसल्याप्रमाणे बधीर बसून होता. अमात्यांनी क्षणभर त्याच्याकडून उत्तराची वाट पहिली व मग डोंबाला सूचना केली. डोंब शांतपणे दूतापाशी आला व त्याने एका प्रहाराने दूताच्या पाठीवरील वस्त्र छेदून बाजूला केले. नंतर एक तिक्ष्ण शस्त्र घेऊन त्याने रक्तरेषा ओढली व निमिषात दूताच्या पाठीवरून तळहाताएवढे कातडे सोलून काढले. पहिल्या आत्यंतिक वेदनेच्या क्षणाने दूत पिळवटल्यासारखा झाला. नंतर ती वेदना केवळ असह्य झाली व तो निश्चेष्ट झाला.
काही काळ तसाच गेला. राजपुत्राच्या मुद्रेवर आत्यंतिक नैराश्यामुळे येणारा द्वेष दिसू लागला., तोच पुन्हा वेदनेचा दंश झाल्याप्रमाणे दूत उठून बसला व आर्ततेने म्हणाला, "या संथ यातनेपेक्षा माझा पूर्ण वध करा. मी अति कृतज्ञ राहीन. मला सम्राटांची आज्ञा आठवत नाही, पण ती राजपूत्राविषयी नाही हे मात्र मी शपथपूर्वक सांगतो."
राजपुत्राचा संताप अनावर झाला व त्याने दूतावर कठोर प्रहार करताच दूत मरगळल्यासारखा झाला व खाली कोसळला. "याला प्रासादाबाहेर फेकून द्या, म्हणजे तो कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडेल!" तो उद्गारला व अमात्यांसह निघून गेला. डोंबाने दूतास मलीन वस्त्राप्रमाणे उचलले व राजमार्गावर आणून टाकले. त्याच्या तेजस्वी शस्त्रांवर रक्ताचे डाग होते, ते त्याने दूताच्या वस्त्रास पुसले व तो निघून गेला.
भद्रानंदाने दूताकडे निरखून पहिले. त्याची हालचाल नव्हती, तरी त्याच्यात अद्याप प्राण होता. त्याने दोन भिक्षुंना पाचारण केले. त्यांनी दूतास उचलले व अति कष्टाने पायऱ्या चढून तो तेथे उभ्या असलेल्या आर्यस्थविरांसमोर अआले. भद्रानंदाने सारी कथा त्यांना सांगितली व म्हटले, "कदाचित मठातील शांत, सात्विक वातावरणात याची स्मृती जागी होईल. मात्र माझा मार्ग निराला आहे. प्रासादात समृद्धीने साध्य झाले नाही, ते उपासमारीने मठात साध्य होईल."
आर्यस्थविरांनी अनुमती देताच भद्रानंदाने दूतास भिक्षूंच्या अत्यंत अरुंद अशा कोठडीत बंद केले व नम्रपणे म्हटले, "सम्राटांची आज्ञा आर्यस्थविरांविषयीच होती, अशी स्मृती आपणास होणे आपल्या हिताचे होईल. तोपर्यंत आम्ही आपल्याला अन्नपाण्याच्या मोहापासून अलिप्त ठेवण्याचे ठरवले आहे. परंतु जर स्मृती जागृत झाली, तर साम्रातान्कडील इच्छाभोजन क्षुद्र वाटावे असे आपले आतिथ्य होईल. आता सूर्यप्रकाश कपोत आकृतीवर आहे. तो कमलदलाना स्पर्श करण्यापूर्वी आज्ञेचे स्मरण करावे."
भिक्षूंच्या त्या अरुंद कक्षेतही दूत तसाच निश्चल राहिला, व पाठीवर धगधगीत स्थडील असल्याप्रमाणे पेटलेली वेदनादेखील त्याच्या डोळ्यात दिसेना. कपोतकृतीवरून सूर्यप्रकाश निरवपणे खाली सरकला. त्याने चतुर्दंत हत्तीला उजळत सहस्त्रदल कमलाला स्पर्श केला. त्याखालील सरोवराचे पाणी क्षणभर प्रकाशमय झाले, काठावरील झाडांची पाने सोन्याची होऊन पुन्हा काळवंडून गेली. परंतु दूताच्या चेह-यावरील निर्जीव भाव बदलला नाही, की ओठातून शब्द उमटला नाही. भद्रानंदाचा निर्विकार चेहराही संतप्त, अधीर होऊ लागला. तो म्हणाला, "आता अनुतापगृहाखेरीज मला अन्य मार्ग दिसत नाही."
भिक्शुनी दूतास बाहेर काढले, त्या वेळी त्याचा देह शुष्क, जर्जर झाला होता व मुद्रेखालील कपालकृती स्पष्ट होऊ लागली होती. त्यांनी दूतास मठाखालच्या विस्तीर्ण तळघरात नेले व तेथे एका वेदिकेवर ठेवले. दोघा भिक्शुनी त्याचे हात-पाय वेदिकेसच असलेल्या अंकुशाना दृढपणे बांधले. क्षीणपणे नि:श्वास सोडत दूताने डोळे उघडले व वर खाली पाहीले. वरच्या बाजूला भिंतीवर टांगलेल्या अनेक यातनायंत्राच्या सावल्या अतृप्त पिशाच्चाप्रमाणे हलत होत्या. वेदिकेच्या सरळ वरच्या भागात एक ताम्रपात्र टांगले होते व त्याभोवतालच्या लोहवर्तुळात जागृत होत असलेल्या अग्नीच्या मंद जिव्हा दिसत होत्या.
हे दृश्य पाहताच दूतास पाठीवरील वेदनेचाही विसर पडला व तो हताशपणे उद्गारला, "धर्मगुरू, तुम्ही काय करणार आहात याची मला कल्पना नाही. पण मला तत्काळ मृत्यू येईल असं देहदंड द्या. मला आता वेदना सहन करण्याचे सामर्थ्य उरले नाही!"
भद्रानंदाचा चेहरा निर्विकार राहिला. तोपर्यंत त्याने पाठवलेला भिक्षु परत आला, व त्याच्या मागोमाग त्याच काळ्या वस्त्रातील डोंब वेदिकेजवळ आला.
"डोंबा, राजदूतास प्रथम तैलदिव्याचा अनुभव पाहिजे. एका आततायी प्रहारापेक्षा सातत्याने होणारा तीक्ष्णग्र आघात जास्त परिणामकारक होतो. हे दिव्य किती काळपर्यंत ठेवायचे हे दूताच्या सूज्ञतेवर अवलंबून राहील." भद्रानंद म्हणाला.
त्याच्या अनुज्ञेप्रमाणे डोंब पाय-या चढून वर गेला व त्याने लोहवर्तुळातील अग्नी जास्त प्रज्वलित केला. आता अग्निजीव्हा संतापल्याप्रमाणे उंचावल्या व लालसेने ताम्रपात्राभोवती फिरू लागल्या. खाली अनुतापगृहाच्या कोप-याकोप-यात अनेक भिक्षु केशरी सावल्यांप्रमाणे एकत्र आले व श्वास आवरून ते दृश्य पाहू लागले. काही काळाने ताम्रपात्र अतिउष्ण, रक्तवर्णी झाले. तेंव्हा डोंबाने त्याखालील छिद्रावरील आवरण बाजूला केले. त्याक्षणी उकळत्या तेलाचा एक गोल, स्पष्ट बिंदू वेगाने उतरला व दूताच्या अंगावर पडला. अंगाला त्याचा स्पर्श होताच आतून एक बुडबुडा यावा त्याप्रमाणे त्वचेवर एक गोलक निर्माण झाला. आणि तेथील वर्तुळ जळून गेल्याने तो काळवंडला. दारुण यातनेने दूत जागच्या जागी ताणल्यासारखा झाला व आक्रोशाने त्याचा स्वर मग्न झाला.
"असेच कांही अंतराने तैलबिंदू पडत राहू देत." भद्रानंद समाधानाने म्हणाला.
"नको, नको! खड्गाने माझा शिरच्छेद करा, तेवढी दया या क्षुद्रास दाखवा!" दूत याचना करत म्हणाला. तोच एक एक थेंब त्याच्यावर पडला आणि अनिवार वेदनेने त्याचे शरीर अस्ताव्यस्त झाले.
"सम्राटांची आज्ञा आर्यस्थविरांविषयी होती, हे तुम्हाला आठवले ना?" भद्रानंदाने सूचित हलक्या स्वरात विचारले.
"नाही, मला ती अद्यापही आठवत नाही." दूत क्षीण, भग्न स्वरात म्हणाला. "पण ती
आर्यस्थविरांविषयी नव्हती."
स्वतः
आर्यस्थविर शांत पावलांनी येऊन सारा प्रकार पहात होते, हे अद्याप कोणाच्याच दृष्टीस पडले नव्हते. त्यांनी निराशेने मान हलवली व म्हटले, "भद्रानंद, या क्षुद्राला येथून शुकराप्रमाणे स्मशानात फेकून दे! नाहीतर त्याच्या मलीन हत्येचा दोष आपल्याला स्वीकारावा लागेल!" त्यांनी मान हलवली व ते निघून गेले.
भद्रानंदाने त्यांची आज्ञा स्वीकारली, पण त्याचा चेहरा विलक्षण कठोर झाला होता. पूर्वायुष्यातील आर्यस्थवीरांचा पुत्र कोठे वाढत आहे हे सांगण्याचे, अंगावरील मांसखंड क्षणाक्षणाला तुटत असताही, एका य:क्वश्चीत पण्यांगनेने नाकारले, तेंव्हापासून हा त्याचा सर्वात मोठा पराभव होता. त्याच्या दृष्टीने अजूनही काही मार्ग साध्य होते. धगधगीत तप्त खड्ग कंठातून खाली उतरवणे, हे कार्य डोंब अतिकौशल्याने करत असे. किंवा एका बंदिस्त हाताला मध लावून त्यावर रक्तजीवी कीटक सोडणे हा उपायही अनेकदा अत्यंत उपयुक्त ठरला होता. जर मग आवश्यकता भासली असती, तर शरीरात मांसल जागी ठिकठिकाणी पोकळ खिळे टोचून त्यांच्यात रक्त जाळणारे अतिविष भरणे, हा मार्गही स्वीकारण्याचा त्याने निश्चय केला होता. या क्षणी आर्यस्थवीर येथे यावयास नको होते. असे त्याला फार वाटले. आणि त्यांच्या आगमनाची सूचना देण्याचे कर्तव्य असलेला तरून भिक्षु तेथेच अतिभयाने स्तंभित होऊन उभा आहे हे पाहताच तर त्याचा संताप अनावर झाला.त्याने डोंबाला बोलावले व त्या भिक्षुस सर्पकक्षेत तीन प्रहार बंदिस्त करण्याची आज्ञा दिली.
"आणि यास स्मशानात फेकून दे!" भाद्रानंद कर्कशपणे ओरडला व विषादाने निघून गेला.
सर्पकक्षेचा उल्लेख ऐकताच इतर भिक्षुंमध्ये हास्याची लाट उसळली. एखाद्या नवख्या भिक्षूला अनेक सर्पांच्या सानिध्यात राहण्याचे शासन केले जात असे. हे सर्व सर्प पूर्णपणे विषहीन होते, पण हा विशेष नवख्या भिक्षूला माहित नसे. मग सर्प अंगावरून फिरू लागताच तो अतिभयाने कसा मूढासारखा वागू लागे हे पाहताना इतर भिक्षुंना हास्य आवारात नसे. मग ते त्याच मुक्त विनोदाने दोन भिक्षु केवळ भयाने कसे मरण पावले व त्यांच्या शरीराखाली हिरव्या रंगाचे तीन निष्पाप साप कसे अकारण चिरडले गेले त्याच्या हकीकती एकमेकांना सांगत. आता भद्रानंद गेल्यावर त्याचं अनिर्बंध हास्यात ते निस्तेज मुद्रा झालेल्या भिक्षुभोवती गोळा झाले.
दोन भिक्षुनी दुताला राक्षसीपणाने उचलले व काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत टाकून दिले. सर्पकक्षेतील विनोदास आपण पारखे होऊ या भीतीने मागे एकदाही दृष्टी न टाकता ते तात्काळ परतले व मठात नाहीसे झाले.
दूताचा देह अतिनिर्जीव झाला होता. कठीण भूमीचा आघात झाल्याने त्याच्या तोंडून एक निर्बल नि:श्वास बाहेर पडला. पण नंतर काही काळ तो जमिनीवर निश्चल पडून राहिला. स्मशानभूमीभोवती झाडांची गर्दी होती व जमिनीवर उंच गवत वाढलेले होते. तेथील गाढ शांततेवर झाडांतील एखाद्या पक्षाचा फडफडाट किंवा तृण-कीटकांचा कर्कश्श, एकेरी स्वर यांच्या डागाखेरीज काही जाणवत नव्हते. काही वेळाने दूताने डोळे उघडले त्या वेळी, हा देह आपला नव्हेच, त्याच्या आत खोल कोठेतरी कोप-यात आपण अतिभयाने अंग चोरून बसलो आहोत हे त्याला उमगले. पण पाऊल हलवण्याचे सामर्थ्यही आता त्याच्यातून ओसरून गेले होते. थोड्या वेळाने गवतावर पावलांचा आवाज आला. कोणीतरी येवून त्याच्या अंगाखाली हात घालून त्याला उठवून बसवले व त्याच्या तोंडाला उष्ण मधुर पेयाचे पात्र लावले.
तो उष्ण प्रवाह शरीरात उतरताच त्याची बधिरता किंचित कमी झाली. पण त्याच क्षणी त्याची वेदना नव्या तीव्रतेने जागी झाली. तिकडे निश्चयाने दुर्लक्ष करून तो म्हणाला, "आता तू मला आणखी काय यातना देणार आहेस?"
त्या उग्र बलवान मनुष्याने त्याला अत्यंत कोवळ्या हातानी उठवून बसवले व अंगावरील खरबरीत पण सुखकारक वस्त्र त्याच्यावर पसरले. "मी आता कसलीही यातना द्यायला आलो नाही," तो सौम्यपणे म्हणाला.
"या स्मशानाशेजारीच माझी झोपडी आहे. तेथे तुम्हाला नेण्यासाठी मी आलो आहे. तेथे आपण निर्भयपणे विश्रांती घ्यावी. तेथे प्रासाद किंवा मठ यांचे वैभव आढळणार नाही, पण त्याचप्रमाणे तेथील अन्नाला वेदनेचा स्पर्श नाही."
प्रासाद-मठाचे नाव ऐकताच दूताचे अंग कंपित झाले. तो म्हणाला, "तुम्ही फार सुह्दय आहात, पण आता मला तुमच्या श्रमांची आवश्यकता वाटत नाही. आता माझा फार काळ उरला नाही. अल्पावधीतच तुम्हाला मला येथे आणावे लागेल. त्यापेक्षा मी येथेच असणे जास्त योग्य नाही का? आता माझ्या शरीराला हालचालीची देखील वेदना सहन होणार नाही. माझ्या शरीराकडे पहा. पाठीवरील उघड्या मांसाला सौम्य वा-याचा स्पर्श झाला तरी सर्वांग मृत होते. या प्रत्येक व्रणातून अग्नी फुलला आहे."
"क्षमा करा राजदूत," त्या उग्र माणसाने म्हटले, "मला ते सारे माहित आहे. तुमच्या पाठीवरील त्वचा मीच काढली, अंगावर तप्त तेल मीच टाकले; कारण मीच तो डोंब आहे. परंतु ती माझ्या कर्तव्यामुळे करावी लागलेली कृत्ये होती. पण अंगावरील काळी वस्त्रे उतरली की मी मुक्त आहे. तेंव्हा आपण कसलाही संशय न धरता माझ्यासह चालावे."

त्याच्या शब्दांनी दूताच्या मनावर विजेचा आघात झाल्याप्रमाणे झाले. अंगावरील बधिरता हळूहळू वितळत जाऊन मनातील शून्यताही विरली. खोल कोठेतरी अद्याप जिवंत असलेला प्रकाशकण तेजस्वी होत गेला व सर्वांग आतून उजळल्यासारखे झाले. दूताने त्याचा हात आवेगाने धरला व म्हटले, " डोंबा, सम्राटांची आज्ञा आता मला सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत आहे. ती आता तुझ्याजवळच प्रकट करणे अनिवार्य आहे. माझा मृत्यू तर आता माझ्या इतक्या सन्निध उभा आहे की त्याचा हिमश्वास आताच मला जाणवत आहे. सम्राटांची आज्ञा अखेर तुझ्यासमोर प्रकट व्हावी अशीच दैवाची इच्छा होती!"
"ते फार मोठे भाग्य आहे. मला ती आज्ञा सांगावी." नम्रपणे डोंब म्हणाला.
"भाग्य असेल, पण ते तसेच अतिकठोर दिव्यही आहे. डोंबा, माझ्या शब्दांकडे लक्ष दे!" उत्तेजित होऊन दूत म्हणाला, "जर तुझ्याकडून या आज्ञेचे पालन झाले नाही, तर तुला मृत्युदंड प्राप्त होईल. सम्राटांना पूर्ण अंतर्ज्ञान आहे. आता आपल्याला एकट्यालाच ही आज्ञा ज्ञात आहे म्हणून जर तू कर्तव्यात कसूर केलीस, किंवा तिच्यात एका शब्दाचे परिवर्तन केलेस, तर तुला दारुण यातना होतील. तुला हे कार्य साहवेल का? अन्यथा दुसऱ्या कोणाला तरी बोलावून आन. पण त्वरा कर, माझे अखेरचे क्षण ओघळून जात आहेत."
"त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. मी कलिकेची अत्यंत पवित्र शपथ घेऊन सांगतो की, माझ्यात प्राण असेपर्यंत मी सम्राटांचा पवित्र शब्द निष्फळ होऊ देणार नाही!"
"तर मग ऐक, सम्राटांची आज्ञा एका डोंबाविषयीच आहे. त्याचे नाव कालमुख आहे. सम्राटांस शैलेश्वराच्या मंदिरात साक्षात्कार झाला. त्या अति पापी कालमुखास तीन दिवसात देहान्ताचे शासन झाले नाही, तर सा-या साम्राज्यावर महान संकट कोसळेल, परचक्र येईल, जनांची भीषण हत्या होईल व रक्ताचे पाट वाहतील आणि स्वतः सम्राटांना जीवितास मुकावे लागेल. त्यामुळे सम्राटांनी मला तात्काळ येथे पाठवले. कालमुखाच्या सर्वांगावरील त्वचा सोलून काढावी व मग सर्व जनांसमोर त्याला उकळत्या तेलात टाकावे अशी ती आज्ञा आहे. ती तू सर्व जनांस विदित कर व आज सूर्यास्ताच्या आत त्या प्रमाणे कृती घडव. जर तू या कर्तव्यात अंतर दाखवशील, तर तुझ्याच सर्वांगावरील त्वचा सोलली जाईल व तू तप्त तेलात अति यातनेने मृत्यू पावशील. कालमुख हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना?"


डोंबाने आपला हात मागे घेतला व तो शिलाखंडाप्रमाणे स्तब्ध राहिला. त्याने दूताच्या क्षीण निर्जीव होत चाललेल्या डोळ्यांकडे अजाणपणे पहिले. दूत सारा प्राण डोळ्यात आणून पुन्हा विचारीत होता, "कालमुख हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना?"
"होय, त्या नावाचा मला विसर पडणार नाही! राजदूत, या नगरात मीच एकटा डोंब आहे आणि माझेच नाव कालमुख आहे."
राजदूताने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात विलक्षण हालचाल झाली, पण दुस-या क्षणी ते निस्तेज होऊन विझले. त्याचा चेहरा म्लान झाला आणि भूमीतील बीजांकुर सतत वर येत असावा, त्याप्रमाणे सतत स्पष्ट होत चाललेली त्याच्या चेह-यामागील कवटी अखेर पूर्णपणे स्पष्ट होऊन गेली.


संकलन:प्रवीण कुलकर्णी


No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....