Showing posts with label भाष्य. Show all posts
Showing posts with label भाष्य. Show all posts

Friday, 31 December 2010

2011 HAPPY NEW YEAR

Tuesday, 28 December 2010

सेनेच्या 'पुणे बंद' ला हिंसक वळण : सेनेचे कार्यकर्ते अटकेत

आज शिवसेनेचा पुणे जिल्हा बंद!

Monday, 16 August 2010

माणूस वाचणारा कवी


वेगवेगळे ग्रंथ वाचून विचारवंत होण्यापेक्षा माणूस वाचायला शिकणे आवश्यक आहे. कारण माणूस या शब्दाइतका पवित्र शब्द नाही. वास्तवाशी संवाद म्हणजे संघर्ष आणि संघर्षाचा संबंध संस्कृतीशी आहे. या संस्कृतीचा निर्माता माणूस आहे म्हणूनच माणूस प्रथम वाचला पाहिजे मगच ग्रंथ वाचले तरी चालतील,‘ या वास्तवतेची जाणीव करून देणारा आणि प्रत्येक कवितेतून सभोवतालच्या माणसांचे अंतरंग, त्यांच्या व्यथा, वेदना आणि कथादेखील आपल्या कवितेतून मांडणारा कवी म्हणजे नारायण सुर्वे!
असा हा आधुनिक लोककवी! लोककवी तुकाराम अनेक विद्वानांच्या प्रबंधांचा विषय बनतो तसाच हा लोककवी अनेकांच्या प्रबंधांचा आणि माहितीपटाचा विषय बनला आहे. आयुष्यात कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने जगणार्‍या नारायण सुर्वे यांच्या जीवनावरील माहितीपट फोर्ड फाऊंडेशनने २३ लाख रुपये ख्रर्च करून तयार करावा हाही एक चमत्कारच म्हणावा लागेल.
फोर्ड फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि ख्याल ट्रस्टने ‘नारायण गंगाधर सुर्वे‘ या नावाने सुमारे ४५ मिनिटांचा एक माहितीपट तयार केला आहे. शांता गोखले यांची पटकथा, अरुण खोपकर यांचे दिग्दर्शन आणि किशोर कदम यांनी अभिनय केलेला हा चित्रपट म्हणजे सुर्वे यांच्या एकूण कवितेच्या प्रवासाचा धावता आढावा घेण्याचा केलेला एक असफल प्रयत्न म्हणावा लागेल.
आपला जन्म नेमका कधी, कुठे आणि कोणत्या आईच्या पोटी झाला याची कोणतीही जाणीव नसलेला आणि तरीही या जगातून गेल्यावर आपले नाव राहणारच या सार्थ अभिमानाने काव्यामध्ये आपल्या हृदयाचा पीळ उलगडवून त्यात जीव ओतणारा कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा आपल्याला परिचय होतो. गिरणीच्या दारावर गंगाराम सुर्वे यांना सापडलेला बेवारशी पोर त्याच्या अज्ञात मातेने नाळ कापून जगाच्या पाठीवर अंधारात भिरकावून दिल्यावर गिरणीच्या संस्कृतीशी त्याच ओल्या नाळेने जोडला गेला, वाढला आणि गिरण संस्कृतीशी नाव जोडून मोकळा झाला. कळू लागले त्याच वयात हातात डबा घेऊन गिरणीत हरकाम्या म्हणून जाऊ लागलेल्या नारायणला या गिरणगावातील संस्कृतीनेच मोठे केले. साधा गिरणीतील हरकाम्या पोरगा सभोवतालच्या वातावरणात मोठा होत असतानाच कधी राजकीय चळवळीत उतरला हे त्याला देखील कळले नाही. त्याच्या कवितेत हेच सतत जाणवत राहिलं आणि जाणवत राहिलं ते सध्या हरवत चाललेलं संवेदनक्षम माणसाचं जीवन!
‘प्रत्येकवेळी कोणतीही गोष्ट ठरवून झाली नाही पण दरवेळी प्रत्येक गोष्ट जमत गेली बुवा‘ अशी प्रांजळपणे कबुली देत आपल्या आयुष्याची ओळख करून देणार्‍या नारायण गंगाराम सुर्वे यांना तरी कुठे ठावूक होतं की आपण इतके ‘ग्रेट‘ होऊ. गिरणी कामगार ते शाळेतला शिपाई आणि त्या शिपायापासून शिक्षक अशी स्थित्यंतरे जीवनात आलेल्या नारायणच्या कविता अनेक प्रस्थापितांनी धुडकावून लावल्या होत्या. जीवनातल्या प्रत्येक स्थित्यंतरात तो आजूबाजूचा माणूस वाचायचा प्रयत्न करीत होता. कधी त्याला डोंगरावर शेत असलेल्या आणि डोक्यावर कवळाचा भारा घेऊन जाणारी कातकरी बाई दिसली तर कधी मास्तरांना त्यांचंच नाव आपल्या पोराच्या बापाच्या जागी लिहिण्याची गळ घालणारी पण मुलाला मोठं करण्याची, चार बुकं शिकविण्याची जिद्द उराशी बाळगणारी शरीरविक्रय करणारी महिला भेटली. कधी त्याला विदेशात पैसा कमविण्यासाठी गेलेल्या आपल्या धन्याला ‘तेव्हढं पत्रात लिवा‘ सांगून त्याचा आपल्यावर असणारा विश्वास सार्थ ठरविणारी गृहिणीही भेटली. स्वतः केवळ व्ह. फा. म्हणजेच व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकलेल्या कवीच्या कविता विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतात हा चमत्कार केवळ नारायण सुर्वे यांच्याच बाबतीत घडू शकतो.
जीवनातील असा चमत्कार सुर्वे यांच्या आयुष्यात नेहमीच घडत आला आहे. ‘डोंगरी शेत माझं गं‘ हे काव्य त्यांनी लिहिले खरे पण या काव्याचा जनक तेच आहेत हे सार्‍या महाराष्ट्राला कळण्यासाठी बराच काळ जावा लागला. डाव्या चळवळीमध्ये शाहीर अमरशेख यांनी हे गाणं जेव्हा ओठात खेळवलं आणि त्यांच्या कलापथकातील सुबल सरकार यांनी ते नृत्याद्वारे सादर केले तेव्हा नारायण सुर्वे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. त्या काळी गाजलेल्या या गाण्यावर जेव्हा ध्वनिमुद्रिका निघाली तेव्हा अनेक प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या.
अर्थात सुर्वे यांना पद्‌मश्री पुरस्कार मिळाला तेव्हादेखील याचीच पुनरावृत्ती झाली होती आणि तोही चमत्कार त्यांनी अनुभवला आहे. त्यांचे समकालीन असणार्‍या एका ज्येष्ठ नाटककाराने सांगितलेली आठवण अशी की, नारायण सुर्वे तेव्हा आपल्या कविता घेऊन प्रस्थापितांकडे जात असत, तेव्हा त्यांच्या अपुर्‍या शिक्षणाकडे आणि साध्या राहणीमानामुळे नाक मुरडणार्‍यांची संख्या काही कमी नव्हती. कै. विनायक भावे यांच्याकडेही सुर्वे अनेकदा आपल्या कविता घेऊन येत असत, पण मानवी स्वभाव कधीही न वाचलेल्या आणि इतरांच्या लिखाणाचे अनुकरण करण्यातच धन्यता मानणार्‍या भाव्यांना सुर्वे यांची कविता म्हणजे उघड्या गटारातील घाण वाटायची. भावे तेथेच राहिले आणि सुर्वे यांची कविता मोठी झाली, असे त्या नाटककाराचे म्हणणे आहे. सुर्वे यांनी प्रस्थापितांशी दोन हात केले ते आपल्या कवितेच्या माध्यमातून. त्याकाळी कविता ही केवळ कल्पनेवरच असायची त्याला सुर्वे यांनी छेद दिला. मर्ढेकरांना उद्देशून त्यांनी लिहिलेल्या कवितेमधून त्यांनी या कल्पनाविष्काराला छेद दिला. प्रस्थापितांच्या घरी आणि त्यांच्या मेळाव्यात जाऊन आपली कविता सादर करण्याचे धार्ष्ट्य त्यांनी दाखविले. सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला अभिनव प्रकाशन या डाव्या चळवळीशी संबंधित असलेल्या प्रकाशन संस्थेने. ‘ऐसा गा मी ब्रह्म‘ या पुस्तकासाठी त्यांच्या हितचिंतकांनी वर्गणी जमवून अभिनवच्या वा. वि. भट यांना प्रकाशनासाठी लागणारे पैसे दिले. हाही या प्रांतातला एक चमत्कार म्हणावा लागेल. अर्थात कवी म्हणून मान्यता मिळाल्यावर सुर्वे यांनी प्रस्थापितांच्या अन्य प्रकाशन संस्थांकडे आपली दुसरी पुस्तके सोपवली हा भाग व्यवहाराचा झाला.
सुर्वे यांचे बालपण ज्या वस्तीत गेले ती वस्ती, तो गिरणगाव आता नामशेष झाला आहे. त्यांची कविता ज्या संस्कृतीशी जोडली गेली ती संस्कृतीही हळूहळू लोप पावू लागली आहे. ‘मी कामगार आहे, एक तळपती तलवार आहे,‘ असे सांगणार्‍या सुर्वे यांनी मुंबईच्या गिरणीची लावणी पेश करून गिरणी कामगाराच्या जीवनाचा क्रम सादर केला आहे. मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात व्यग्र असलेल्या चाकरमान्याची व्यथा ‘माझी मैना गावावर राहिली‘ ही छक्कड सादर करून कष्टकर्‍यांचे जीवन स्वतः जगलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मांडली तर कळू लागल्यापासून धागा कसा धरायचा आणि बॉबीन कशी भरायची हे शिकलेल्या नारायण सुर्वे यांनी ‘सात वाजता सकाळी, भोंगा वाजवी भूपाळी‘ ही लावणी सादर करून गिरणगावाचे यथार्थ दर्शन घडविले आहे. आजही अनेक वयोवृध्द गिरणी कामगारांच्या ओठावर ही लावणी आपसूक येते आणि त्यांचे पाण्याने भरलेले डोळे बंद गिरण्यांच्या दाराकडे वळतात. आता भोंगा बंद झाला आणि कामगारांच्या पाळ्यादेखील बंद पडल्या पण सुर्वे यांची ही लावणी इतिहासात गाजून गेली.
याच गिरणीच्या आयुष्यात त्यांना त्यांची जीवनसाथी मिळाली आणि तिथेच त्यांना मार्क्सही भेटला.
‘असाच एकदा मोर्चात मार्क्स मला भेटला‘ असे सांगत आपण कम्युनिस्ट चळवळीशी कसे बांधले गेलो याचे वर्णन करणार्‍या सुर्वे यांना याच कम्युनिस्ट चळवळीने सांस्कृतिक चळवळीची उपेक्षा केली याचे वैषम्य वाटते. या देशातील सांस्कृतिक जडणघडणीकडे कम्युनिस्ट चळवळीने म्हणावे तेव्हढे लक्ष दिले नाही अन्यथा नारायण सुर्वे यांच्यासारखे अनेक कवी-कलावंत आजही डावी चळवळ फोफावण्यासाठी धडपडले असते. त्यांच्या ‘मार्क्स‘ कवितेत अखेरीस ते म्हणतात, ‘मला गर्दीत पाहून मार्क्स म्हणाला काय कविता-बिविता करतोस वाटते. मलादेखील गटे आवडायचा.‘ या वाक्यातच चळवळीकडून होणारी सांस्कृतिक उपेक्षा लक्षात येते. सुर्वे यांच्या ‘माझी आई‘ ही कवितादेखील अशीच नोंद घेणारी आहे. आपल्या जन्मदात्रीचा पत्ता माहीत नाही पण बेवारशी असलेल्या एका अनाथाला पोटच्या पोराच्या मायेने उराशी घेऊन नंतर त्याचा प्रतिपाळ करणार्‍या त्या मायेचे वर्णन करणारी कविता सुर्वे जेव्हा सादर करतात तेव्हा डोळ्यातून पाणी न येणारा हृदयशून्य माणूस सापडणे कठीण! शिक्षकाच्या भूमिकेत असतानाही केवळ मुलांवर पाठ्यपुस्तकी संस्कार करण्यापेक्षा त्यांना माणूस वाचायला लावणारे सुर्वे आपल्या जीवनाचे सार कशात आहे, हेही मुलांना शिकवितात तेव्हा त्यांच्यातील माणूस म्हणून असणार्‍या संवेदना मनाला भिडल्याखेरीज राहत नाहीत.
प्रसाद मोकाशी

Friday, 16 July 2010

एका दारुड्या {सोबर} बापाचे {कृपा} मधल्या गुरुजींना हे पत्र....


अब्राहम लिंकनच्या हेडमास्तरांना पत्रातील कांही शब्द आणि इथे{कृपा} सतत कानावर आदळणारे सोबर, सोब्रायटी असे कांही शब्द आणि क्वचित स्वतःचा एखादा शब्द घालून हे "एका दारुड्या बापाचे, जो आता कृपाचा एक्स पेशंट आणि सोबर ए.ए. मेंबर आहे,त्याचे रीह{कृपा} मधल्या गुरुजींना हे पत्र.....अब्राहम लिंकनच्या हेडमास्तरांना पत्राच्या चालीवर एका दारुड्या {सोबर} बापाचे {कृपा} मधल्या गुरुजींना हे पत्र....


प्रिय गुरुजी,
सगळीच माणस मद्यप्रिय नसतात
नसतात सगळीच मद्यमुक्त
हे शिकेलच माझा मुलगा कधी-ना-कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा-
जगात प्रत्येक दारुड्यागणिक
असतो एक 'सोबर'ही
स्वार्थी हितसंबंधी असतात जगात...
तसे असतात मद्यमुक्तीसाठी अवघं आयुष्य
समर्पित करणारे महात्मेही (जसे : फादर जो)
असतात टपलेले (अविवेकी) विचार
तसेच जपलेल्या भावनाही


मला माहित आहे, सगळ्या गोष्टी
झटपट नाही शिकवता येत...तरीही
जमलं तर त्याच्या मनावर ठसवा,
पहिलाच घोट घटक आहे
कितीही फुकट मिळाला तरीही


(मद्यासमोर) हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा 'सोब्रायटी' चा आनंद संयमानं घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर (उच्च शक्ती)
त्याला स्वभावदोषांपासून दूर राहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला

"ऑब्सेशन"ला भीत जाऊ नको म्हणावं
त्याला नमवणं सर्वात सोपं असतं!

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला
मद्यमुक्तीच अद्भुत वैभव,
मात्र त्याचबरोबर,
पाहू दे त्याला, जीवनातलं प्रखर वास्तव
कडक उन्हात वणवणणारी माउली अन
बापाविना झोपडपट्टीत खितपत पडलेली मुलं

'कृपा'त त्याला हा धडा मिळू दे--
{स्वतःला} फसवून प्यालेल्या मद्यापेक्षा
सरळ स्वीकारलेलं दारूडेपण श्रेयस्कर आहे


ए.ए.चे विचार,कल्पना
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा त्यानं फोर्थ स्टेप करावी
आणि गुणदोषांची नोंद करावी


माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा--
(स्लीपरी प्लेसेस) निसरड्या जागांकडे धावत
न सुटण्याची ताकद त्यानं कमवायला हवी
पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं शेअरिंग, अगदी सर्वांचं
पण पडताळून पाहावं, तुलना न करता
अनुभवांच्या चाळणीतून


सरसकट नसतील कदाचित सर्व अनुभव त्याला
पण ओळखावेत स्वतःशी निगडीत असतील ते...
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा
ए.ए.चा १२ स्टेप प्रोग्राम
आणि म्हणावं..
शेअरिंग करायची लाज वाटू देऊ नको
त्याला शिकवा
उच्च शक्तीचे महत्व
आणि स्वभावदोषांपासून लांब राहायला

त्याला पुरेपूर समजवा की,
करावी नुकसानभरपाई त्याने
नवव्या पायरीनुसार, पण
कधीही दर्शवू नये -- दिखावू वरवरपणा!
सोब्रायटीत टोमणे मारणा-यांच्या झुंडी आल्या तर
कानाडोळा करायला शिकवा त्याला
आणि ठसवा त्याच्या मनावर
'सोबर' जगण्यासाठी पाय रोवून लढत रहा!


त्याला ममतेने वागवा पण
दिनक्रमासाठी शिस्तीचेही महत्व पटवा..
"कृपा" मधून निघाल्याशिवाय
व्यसनाधीनाचा 'सोबर' होत नाही

त्याच्या अंगी बाणवा
परिस्थिती बदलण्याचे धैर्य
अन धरला पाहिजे धीर
जर राहायचे असेल 'सोबर'
आणखीही एक सांगत रहा त्याला --
आपला दृढ विश्वास पाहिजे ए.ए.वर आणि स्वतःवर
तरच राहशील अखंड 'सोबर' सातत्याने
आणि लुटू शकशील ,
ख-या 'सोब्रायटी' चा आनंद

माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे
पण पहा...जमेल तेवढं अवश्य कराच
माझा मुलगा....भलताच बेवडा आहे हो तो !!


प्रवीण कुलकर्णी

Thursday, 1 April 2010

वृक्षतोड आणि आपण


पर्यावरण, जागतिक तापमानवृद्धी (ग्लोबल वॉर्मिंग) आणि वृक्षसंवर्धन याविषयी आपण अनेकदा बोलतो, विद्वानांचे परिसंवाद ऐकतो. समाजसेवी संस्था, मंडळे, कुठेतरी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतात, त्याचे पुढे काय होते, ते वृक्ष कोण संगोपन करतो हे अलाहिदा! पण राहून राहून प्रश्न असा उभा राहतो की, जी जंगले आहेत, त्यांचे काय? त्यांची अशी बेकायदेशीर, हजारोंच्या घरात तोड होते, याला पायबंद घातला तर निश्चितच पर्यावरण, जागतिक तापमानवृद्धी (ग्लोबल वॉर्मिंग)इत्यादी इत्यादी प्रश्नांचा मुकाबला करता येईल. नको तिकडे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे वांझोटे मैथुन करण्यापेक्षा आहे त्या आणि आपणच नामशेष करत चाललेल्या जंगलांविषयी आपण सजग राहिले पाहिजे पण दुर्दैवाने तसे घडत नसल्याचे दिसते. याविषयी अक्षरश: अंगावर काटा उभे राहील असे वास्तव बाबा(अनिल अवचट) यांनी दहा ११ वर्षापूर्वीच प्रत्यक्ष फिरून माहिती गोळा करून लिहिले आहे ते 'प्रश्न आणि प्रश्न' या लेखसंग्रहात पुस्तकरूपात आहे, मात्र तरीही इथे द्यावे वाटते. तो लेख खाली दिला आहे. त्यामुळे काहीनाही तरी निदान थोडी जंगलाविषयी जागरूकता वाढेल!


प्रवीण कुलकर्णी

Monday, 15 March 2010

Tuesday, 2 March 2010

सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.!!






काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो, सुन्नत होती सबकी…
संकलन:प्रवीण कुलकर्णी

Wednesday, 17 February 2010

'टूबी ऑर नॉट टूबी' आणि असंच काहीतरी...


आज चार वाजता 'कृपा' मध्ये रीलॅप्स प्रिवेन्शन मिटिंग मध्ये बरेच काही मुद्दे नव्याने उजळले गेले.पण माझ्यामते हा 'हॅम्लेट' मध्ये पडणारा प्रश्न आहे.थोडाफार तसा असतो! पुढे काय होणार याची स्पष्ट कल्पना असते, हि फक्त स्लीप आहे, हा काही रीलॅप्स नाही, असे कांही समर्थनेही असतात.निदान माझ्याबाबत तरी असतात! त्यासाठी माझ्यामते फक्त जागरुकता महत्वाची वाटते.त्यासाठी जसे मॅडम, सर सांगतात तसे एकतर आपण स्वतःशी खुश नसतो हे एक आणि आपण वर्तमानात नसतो हे एक, तर कितीही केले तरी मनात दुसरे किंवा प्रसंगाला धरून पण स्वतःशी निगडीत मानून विचार येतातच, बाकी सर्व विषय जरी आपल्या [म्हणजे माझ्या] डोक्याबाहेर असले तरी नेमके पाच मिनिटे तरी आपण एखाद्या प्रसंगाला तठस्थपणे पाहू शकलो का? किंवा शांतपणे उभे राहू शकलो का? हे पाहण्याचा प्रयत्न केला.[म्हणजे पाहत वगैरे असताना डोक्यात असा अजिबात विचार नव्हता पण रात्री [म्हणजे पहाटे] झोपताना विचार आला. तर उत्तर 'काहीतरी असेच' असे आले.म्हणून ते पाच मिनिटे थोडी आठवली!
'कृपा' मधून साधारण साडेसहा वाजता बाहेर आल्यावर थोडा नास्ता करून थेट शनिवारवाडा गाठला.[तेवढीच फुकट काही करमणूक आहे का? पाहण्यासाठी] तर तिथे 'कसबा श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा सुरु होणार होती, सुरु व्हायला बऱ्यापैकी वेळ होता, जाऊद्या,थोडे फिरून येऊ असा विचार केला पण तेवढ्यात पिंकी [लहान बहिण] गावाहून येणार, ती आली असेल घरी जाऊ म्हटले.
मधल्या मार्गे पूल ओलांडला कि मनपा! जाऊ घरी.अस विचार केला.पुलाच्या अगदी कोपऱ्यावर एक बिडी शिलगावली, थोडे शांत राहून एकदोन झुरके घेतले तोच पंकज उधासच्या गझलची एक ओळ गुणगुणताना एकटाच स्वतःशी हसलो! आता इथे एक स्वगत..."घरी गेल्या-गेल्या पिंकीला मी गाणे गात किंवा ऐकत असताना बोलू नये अशी ताकीद द्यावी लागणार!"
त्याचंही कारण आहे ते असं... मी मागच्याच आठवड्यात पंकज उधासची नशा अल्बम मधली एक गझल ऐकत होतो,सोबत तीही होती, त्याची एक ओळ किंवा शेर असा होता..
"हम ऐसे रींद, जो अक्सर महिनो तक नही पीते[२]
अगर पिणे पे आजे तो, फिर पैगम भी पीते है
तर पहिल्या ओळीतच तिने मला गार केले कारण मीही मन लाऊन म्हणत होतो तोच ती म्हणाली, अक्सर महिनोतक नही पीते म्हणजे 'रीहॅब' मध्ये असतो! आणि बऱ्याच काय माझ्याबाबत तर हे खरेच आहे!म्हणून शांतपणे गाणे गुणगुणायची देखील चोरी!
मग अचानक थोडी गडबड ऐकू आली, कुणाचा तरी कुणाच्यातरी मोटारसायकलला धक्का लागला, त्यावरून हमरातुमरी, तू कोण? मी कोण? तुझ्या आयला..मायला..बघतो..दाखवतो..इत्यादी इत्यादी.त्यातही करमणूक चांगली होते! सिग्नल लागला कि सर्व शांत, खुमखुमी असणारे पुन्हा कुठेतरी भांडतील!
आता जाऊन गाडी पकडावी म्हणून निघालो तोच तीन-चार एकंदर पेहरावावरून आधुनिक आणि कुठल्यातरी विद्यार्थी वाटणाऱ्या मुली, एका सात आठ वर्षाच्या भिकारी मुलीला पाणीपुरी खायला देत होत्या आणि ती भिकारी वाटणारी लहान मुलगी पाणीपुरी अधाशासारखे खात असताना कुणी मोबाईल तर कुणी डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढत होते! आता इथे नवल काही नाहीं, आपण काही सर्व गरिबी दूर करू शकत नाहीं, आपण समाजसुधारक नाहीं, आपले काही देणेघेणे नाहीं हे सर्व मान्य तरी त्या अर्ध्या मिनिटात क्षणभर विचार आलाच कि, कदाचित आपले लग्न झालेले असते आणि व्यसनात अद्याप असतो तर ती मुलगी आपलीच असू शकली असती! असो.
तर या चार पाच मिनिटाचाच विचार केला तरी एकंदर आपण [म्हणजे मी!] कुठे तरी तठस्थ राहू शकत नाहीं हेच खरे! पुढेही गाडीत खरोखर अपंग आणि वृद्धाना जी जागा राखीव असते त्यावर कोणीतरी बसलेले त्यांच्याशी कंडक्टर ची हुज्जत...आपलाही नकळत हस्तक्षेप! त्यापेक्षा आता घरी जाऊन मस्त सिनेमा पाहावा हे उत्तम!!


Saturday, 13 February 2010

पुणे बॉम्बस्फोट

आता तरी फालतू गोष्टीपेक्षा सरकार खरोखरीच सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष देईल का?
तरी परदेशी नागरिक मारले गेले तर आपोआप कळवळा येतोच!
सामान्य माणसाने काय करावे? कोणाला दोष द्यायचा?
का मुंबईसारखे लगेच विसरून जाणार?
शेवटी सरकारला दोष देण्यापेक्षा
आपणच सजग राहिलेले बरे!
एक अस्सल पुणेकर!
जय महाराष्ट्र!!

Friday, 12 February 2010

सवंग पत्रकारिता

सिनेमा बघणारे सर्व अमराठी होते हि झाली पहिली गोष्ट, आता प्रश्न असा पडतो कि, इतका पोलीस फौजफाटा बंदोबस्त साध्या सिनेमासाठी कशासाठी गृहमंत्री बॉम्बस्फोट झाल्यावर लवकर भेट देत नाहीत ते सीनेमा बघायला आले याचे कौतिक? खरेच दोन्ही कॉंग्रेसने लाज सोडली आहे .
मुख्य मुद्दा सिनेमा, त्याची कथा अथवा शाहरुख खान एक अभिनेता असा नाही तर त्याच्या देशविरोधी भूमिकेबद्दल आहे.
तो आय पी एल च्या एका संघाचा मालक आहे! त्याने हवेतर ते आणि ऑस्ट्रेलिअन खेळाडू खरेदी करायचे होते!! कुणी अडवले होते? सरकार तर काहीच सांगत नाही तेंव्हा सवंग प्रसिद्धी आणि कॉंग्रेसचे घाणेरडे राजकारण आणि माध्यमांची हास्यास्पद भूमिकेमुळे किंवा अकलेच्या कर्जबाजारीपणामुळे नको तिथे नको त्याला प्रसिद्धी मिळते! शिवसेनेची भूमिका रास्तच आहे त्यात वाद नाही पण शाहरुख खानला खेळाडू खरेदी का केले नाहीस याचा जाब कोणीही जागृत म्हणवणारे पत्रकार/मध्यम पंडित विचारीत नाहीत हे दुर्दैव आहे.

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....