२४-०७-२००९
मी दोन दिवस 'विवेकनिष्ठ विचार पद्धती'[ REBT ] याबद्दल वैशाली मैडम तास घेतात त्या तासाला जात होतो.माझ्या अल्पमतीनुसार मला जे आकलन झाले,त्यावर चाळा म्हणून मी गत-आयुष्याशी विचार करू लागलो.आणि माझे मलाच प्रचंड धक्काच बसला.कारण माझ्या २० वर्ष्याच्या व्यसनाधीनतेत जरी पहिली ५ वर्षे मी नियमित मात्र मर्यादित मद्यपान करत होतो.नंतरची १५ वर्षे अति-मद्यपानात गेली.समजा एका दिवशी मी किमान ५ वेळा अविवेकी/अविचारी वागलो तर...
5X365X15 =?
हे म्हणजे बिल गेटस आणि अंबानी बंधू यांची एकत्रित संपत्ती एक रुपयाच्या नोटांनी मोजण्यासारखे झाले.
जेथे एखाद्या चुकीच्या निर्णय अथवा घटनेने जीवन उध्वस्त होते,तेथे हे म्हणजे अतीच झाले.
गम्मत म्हणजे मी या वागण्याचे चक्क समर्थनही करत असे ते असे.....
माणूस हा जगात एक कठपुतळी सारखा आहे.काही माणसे जगात इतरांना दुःख देण्यासाठीच जन्माला येतात.यासाठी तुकाराम महाराजांचा एक अभंग [जो आता आठवत नाही] पण आशय रूपकातून सांगत असे.तो आशय पुढीलप्रमाणे......
ग्रामीण भागात सावरी नावाचे झाड शेतात,शिवारात येते.ते आपोआप येते.त्याला धड पाने नसतात,त्यामुळे सावलीच्या कामी नाही,फळे,फुले येत नाहीत.शिवाय जमिनीचे शोषण करून ते इतर झाडांना फुलू देत नाही.
हे असे अत्यंत निरुपयोगी झाड शेतकरी कापून टाकतो.व पुढेमागे आपल्या झोपडीला कुडाचा आधार म्हणून ठेवतो.पण ते इतके ठिसूळ व पोकळ असते,कि त्यावर धोंडा ठेवताच ते दबून जाते.वैतागाने त्याला तो दाराबाहेर टाकून देतो.
एक दिवस शेतकऱ्याच्या घरातील इंधन [सरपण] संपते.ऐनवेळी त्या माउलीला ते झाड दिसते.त्याचे तुकडे-तुकडे करून ती चुलीत घालते पण ते जळतानाही नीट जळत नाही!धुपत-धुपत,डोळ्यांना धुराचा त्रास होऊन जळते.
याप्रकाराने मी स्वतःच्या वागणुकीचे समर्थन करत असे.माझाही जन्म असाच निरुपयोगी आहे व केवळ दुसर्यांना त्रास देण्यासाठीच आहे.अशी मी धारणा केली होती.पण आता कळते कि ती धारणा किती चुकीची होती.विवेकनिष्ठ विचार पद्धतीने वागल्यास/विचार केल्यास किती फायदा आहे हे समजू लागले आहे.विवेकनिष्ठ विचार पद्धती आणि आणखीही मानवी वर्तन,विचार करण्याची पद्धत यावर जर मी मन:पूर्वक काम केले तर जास्त नाही पण निदान माणूसपणाच्या पातळीवर जगता येणे शक्य आहे.कारण या पद्धतीने गतायुष्याचा काटेकोरपणे विचार केला तेंव्हा माझे वर्तन पशुतुल्य होते हे मान्य आहे.
अर्थात असे वागणे सरावाचा भाग,सवयीचा भाग केल्यास मला आशेचा किरण दिसू लागला आहे.
हे असे करणे अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.पण अशक्य मात्र नाही याची खात्री वाटते.कारण येथून पुढे मला साधुसंत,महात्म्यांच्या पंगतीत जरी बसायचे नसले ,तरी किमान मनुष्यत्वाच्या पातळीवर जगायचे आहे.
नमस्कार,
प्रवीण,तुम्ही खूप उत्तम साहित्य वाचलं आहे आणि त्याचा संदर्भ योग्य रीतीने तुमच्या व्यसनाशी लावता येतो हे खूपच छान आहे पण त्यात नुसतंच रमून चालणार नाही.उत्तम वाचन आणि त्यानुसार योग्य वर्तनाची जवाबदारी आपण घेऊ शकतो का?
प्रवीण,तुम्हाला "स्व" ची कल्पना आहे का?तुमचा स्वभाव लिहून काढा.
संगीता जोशी मॅडम
No comments:
Post a Comment