Friday 29 January 2010

13-11-2009

मी जास्त दिवस सोबर [फक्त न पिता] राहिलो नाही हे अगदी खरं आहे.त्यामुळे मला प्रथम त्याबद्दलच भीती वाटते.यासंदर्भात पुन्हा एकदा खलील जिब्रानची एक छोटी गोष्ट आठवली.
एक छोटी वाडी असते..कुत्र्यांची.त्यात बरीच कुत्री राहत असतात.पण आपापसात कलह, विद्रोह, भांडण, मारामारी, प्रचंड असते.त्यात एक वेगळा, समाजसुधारक, 'नेता' या गटात मोडणारा एक कुत्रा असतो.तो सतत विचारीपणाने सर्वाना 'बाबानो, भांडू नका, शांत राहा' वगैरे असे आवाहन न थकता सातत्याने करत असतो.तो विचारीपणाने हे करत असतो.
एके दिवशी अचानक सर्व कुत्री भांडायची, मारामारी करायची थांबतात.आठवडा होतो, महिना होतो, सर्वत्र शांतता प्रस्थापित झालेली असते.हा 'सुधारक' कुत्रा अस्वस्थ होतो.मग तो एक युक्ती करतो.के दिवशी पहाटे एकटा लपून माळावर जातो.व स्वर बदलून तारस्वरात किंचाळू,भुंकू लागतो.ते ऐकून पुन्हा इतर कुत्री मूळपदावर येतात.सर्व पुन्हा नित्यनियमाने चालू होते.मग हा 'नेता', 'सुधारक' कुत्रा परत वापस येऊन आपले 'दुकान' चालू करतो...'बाबानो, शांत राहा, भांडू नका!'
जिब्रानची कथा जरी पथदर्शन,मार्गदर्शनाचा अविर्भाव करून अनुयायांना परत वाममार्गाला लावणारे राजकीय, सामाजिक उपहासगर्भ लेखन असले तरी, माझ्या संदर्भात....
माझ्या मनात अशीच एक कुत्र्यांची वाडी असते.ह्यात बरेचसे तर्कदुष्ट, तर्कविसंगत कुत्री सतत आपसात कलह करीत असतात.हा 'नेता', तर्कनिष्ठ, तर्कसंगत कुत्रा त्यांना समजावत असतो...
एके दिवशी त्याच्या समजावण्याने ही तर्कदुष्ट, तर्कविसंगत कुत्री कलह बंद करतात.[काळ :कांही दिवस, कांही महिने]
आता नंतर ही तर्कशुद्ध, तर्कनिष्ठ आणि तर्कसंगत कुत्रा...याचे दुसरे अजून एक नाव 'युक्तिवाद' आहे! हा असाच माळावर जाऊन वेगळा सूर काढतो, मग सारी तर्कदुष्ट, तर्कविसंगत कुत्री पुन्हा आपला कलह राजरोस सुरु करतात;
मग हा तर्कनिष्ठ, तर्कसंगत कुत्रा परत त्यांना वाटेवर आणण्याचा प्रयत्न केल्याचे दाखवतो.

टीप: एवढे सगळे लिहिण्यापेक्षा सरळ, सध्या शब्दात 'मला सर्व कांही सुरळीत असताना टेन्शन मध्ये राहावे वाटे, हे करण्यासाठी दारू प्यावी लागते!कारण त्याने टेन्शन आपोआप क्रिएट होते!'एवढे दोन वाक्ये सांगणे;बोलणे जीवावर येते.
एवढे कौन्सिलर इथे हजार असतात पण कधी विचारू वाटत नाही, बिडीझोन मध्ये फालतू, वायफळ बडबड पुरे म्हणेपर्यंत चालू असते मात्र कामासंदर्भात मात्र योग्य ठिकाणी [इथे वा कुठेही] तोंड उघडत नाही.
लोक कांही अंतर्ज्ञानी नसतात हे कळते पण बोलू वाटत नाही हे खरे.हा दोष आहे हे मान्यही आहे पण तो कसा
घालवावा ते कळत नाही.कारण योग्य ठिकाणी न बोलल्यामुळे मला मुळात काय हवंय ते समोरच्याला [घरात, बाहेर] कळलेले नाही. असे थोडे आता जाणवत आहे.
दारूच्या गुत्त्यात जेवढे बोलतो त्याच्या २% जरी घरात, किंवा कामाच्या ठिकाणी बोललो तरी चालले असते असे आता वाटते.

नमस्कार,
स्वतःला 'का' हा प्रश्न विचारून बघा ना कि मी का बोलत नाही? कदाचित तुम्हाला इतरांकडून उत्तरं नको असतील, कदाचित तुम्हाला आमच्याशी बोलायला जमत नसेल तर का?
पुढच्याबद्दल अविश्वास कि स्वतःबद्दल खात्री नाही? इतक्या शक्यतांपैकी कोणती आहे का बघा.
आपण नक्की बोलू.
वैशाली जोशी मॅडम





No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....