
उष:काल होता होता काळरात्र झाली!
अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
आम्ही चार किरणांचीही
आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची
वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली!
तेच घाव करिती फिरुनी
ह्या नव्या कटारी;
तेच दंश करिती आम्हा
साप हे विषारी!
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुशाली?
तिजोऱ्यात केले त्यांनी
बंद स्वर्ग साती,
अम्हावरी संसाराची
उडे धूळमाती!
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली!
अशा कशा ज्याने त्याने
गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे
होतसे खरेदी?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली!
उभा देश झाला आता
एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा
दुधाने जळाला!
कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली!
धुमसतात अजुनी विझल्या
चितांचे निखारे!
अजुन रक्त मागत उठती
वधस्तंभ सारे!
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली!
सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment