Monday 15 November 2010

30/06/2010


आज रीलप्सचा वर्क पेपर बघितला. त्याविषयी वर्कपेपरच्या वहीत लिहिलेच आहे. पेपर पूर्ण लिहिला नाही, कारण डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.त्यावर लिहित होतो. म्हणून पेपर लिहिला नाही. पेपर का सोडवायचा? तर त्यातून स्वतःची स्वतःला एक नवीन ओळख प्राप्त होते. चुका समजतात, आणि मार्गदर्शन देखील प्राप्त होते. हे खरे असले तरी....
वर्क पेपर लिहिताना मी मुद्दामच पाल्हाळीक भाषा, विस्तार आणि साचेबद्धपणा मुद्दाम, जाणीवपूर्वक टाळला आहे. (मी मागच्या एका  केंद्रात होतो तेंव्हा माझ्या मनातील ऐसपैस लिहिण्याऐवजी माझ्या कौन्सिलरला साचेबद्ध उत्तरे हवी होती!)
साचेबद्ध या अर्थाने की, मी तसे लिहीन देखील मात्र 'सामाजिक नुकसान' यात काय लिहिणार? मी संपूर्ण दारुडा ज्या वयात झालो, त्या वयात समाजाशी ख-या अर्थाने  माझी पुरती ओळख देखील झाली नव्हती....'आर्थिक नुकसान' मी लौकिकार्थाने पैसा कधी कमावलाच नाही....ते एकच आणि शारीरिक पातळीवरचे नुकसान कदाचित सांगता येईल, मात्र मानसिक नुकसानीचा अद्याप अंदाज देखील नाही.  असो.
मी जुने QT वाचतो त्यावेळी, ब-याचदा हसू येते. की त्या वेळी आपले विचार 'असे' होते! पण ते विचार आता पूर्णत: बदललेले असतात. हे सहज घडत नाही त्यामागे कांही न कांही काम जाणीवपूर्वक केलेले असते.
बदललेले विचार, त्यासोबतच इतरांपेक्षादेखील स्वतःच्याच स्वतःकडून वाढलेल्या अपेक्षा, आणि ज्यावेळी अशा अपेक्षा वाढतात त्यावेळी त्या त्या अपेक्षापूर्तीसाठी योग्य ते परिश्रम घ्यायची माझी तयारी नसते.
इतरांना दु:ख न देता मी आनंदी आणि 'सोबर' राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे हेच मी सोयीस्करपणे विसरतो. आणि त्यात भर म्हणजे मला माझ्या आनंदाची व्याख्या देखील ठरवता येत नाही.
आज कान्हेरेंचा सोब्रायटीचा पहिला वाढदिवस झाला. तेंव्हा त्यांनी सांगितलेले देखील पटते की, एकदम स्वभावदोष वगैरे काढण्यापेक्षा या भानगडीत न पडता प्रथम कृतीपासून दारूपासून दूर राहिले पाहिजे;
म्हणजे पुन्हा एकंदरीत प्राथमिकता दारू न पिणे हि आली. पण माझ्यामते वेळ द्यायला हवा याचा अर्थ त्या वेळेत जमेल इतपत स्वतःवर काम करणेदेखील आवश्यक आहे.
जसे, मी एखादी घटना मला वाईट वाटली, तर त्याचे विश्लेषण करत बसतो...त्याचप्रमाणे एखादी घटना मी टाळली, किंवा अगदी मनासारखी झाली तरी त्याचा स्वतःपुरता अर्थ लावून विश्लेषण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. पुन्हा असो.
आता काल स्वार्थासंबंधी लिहिल्याने स्वहित आणि स्वार्थ यांत गल्लत होत नसली, तरी आत्मकेंद्रित वृत्तीमुळे क्षणिक समाधान आणि स्वहिताला बाधा पोचल्याचे जाणवते. हे जाणवते तर कधी? तर नुकसान झाल्यावर! त्यासाठी positive self talk कसा असावा?
त्याचबरोबर कोणत्याही केंद्रातील , 'मी येथे का आहे?' हा सनातन प्रश्न जसा वैदिक संस्कृतीत को SS चे उत्तर   सो SS हम आहे तसे आहे. आणि माझ्या बाबत या  प्रकरणाचा संदर्भ घ्यायचा तर, आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे...
'हौसेने केला पती..
त्याला फुटली रगतपिती...!'
आणि आताच परत काय दक्षता घ्यावी हे समजले नाही तर पुन्हा हरिदासाची कथा मूळपदावर येऊन परत "QT पंचविशी" लिहिण्याचा प्रसंग ओढवेल!(यात पुन्हा विक्रम कोण आणि वेताळ कोण हा प्रश्न आहेच...!)


नमस्कार,
आपण यासंदर्भात बोललो आहोतच पण  self direction + concern about others
हे देखील स्वहीतामध्ये include असतं. self talk मध्ये माझ्या मते +ve किंवा -ve हे नंतर, मुळात जे वाटतं(परिस्थिती,मानसं) त्याचा awareness असणे जरुरी आहे. दुसरे म्हणजे घडणा-या गोष्टीत emotions ऐवजी rational approach असावा. आपण हे उदाहरणादाखल बोलू म्हणजे I can explain .

वैशाली मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....