Sunday 31 October 2010

14/06/2010

आज भेटायला आई आल्यावर आनंद देखिल वाटला पण.. एकीकडे विषाद देखिल वाटत होता कारण जेंव्हा तिने सांगितले की, बस मधे चढ़ता येत नाही, कारण माझ्यामुळेच तिला हा अधूपणा आला आहे हे सहज विसरता येत नाही.
तुम्ही आर्थिक प्रश्नाविषयी विचारलंत तेंव्हा आज खरेच माझ्याकडे पैसा असता तर मी निश्चितच अजूनही दारूच पीत राहिलो असतो. माझ्यात व भावाच्यात जरी सामंजस्य आहे तरी आज कामापुरता पैसा आहे म्हणून आततायी निर्णय घ्यायचे नाहीत असे ठरवले आहे. कारण त्याचे काय करायचे? अन्यथा पैसा कसा वाढवता येईल याकडे माझे निश्चितच लक्ष आहे. पण जेंव्हा लौकिकार्थाने जेंव्हा कामाचा विषय निघतो तेंव्हा मला फक्त मर्यादाच दिसतात. कारण जेमतेम बुद्धी आणि कसलाही अनुभव नाही, व्यवहारज्ञान नाही, आणि समाजाची भीती, हि ती करणे होत. दारू न पिताच राहायचे तर इथे काय किंवा मला घरात कोंडून घेऊन देखील राहता येईलकी! पण त्याला अर्थ नाही. जिथे माझा कुणावर आणि कुणाचा माझ्यावर विश्वास नव्हता तिथे आता हळूहळू बसत चालला आहे हे  देखील काही कमी नाही तेंव्हा एखाद-दोन वर्षे अवलंबित्व काही वाईट नाही. हे सर्व लिहिण्याचेही कारण आहे की, मी पटकन विसरतो. त्यासाठी कधी निवांत क्षणी वाचून ह्या जाणीवा जागृत ठेवाव्या लागतात.
आत्ता हे लिहिताना फळ्यावर इनपुटचे डिफेन्स लिहिलेले होते तिकडे नजर गेली. मी स्वतः एकेका डिफेन्सचे पूर्ण वह्या भरभरून उदाहरणे देऊ शकतो कारण तेवढी मी ती वापरली आहेत. पण आता त्याबाबत कधी कधी जागृत नसतो हेदेखील मान्य!
पण खोटं बोलणे हे पार हाडीमाशी मुरलेला डिफेन्स आहे. आता मी कणेकरी वाचत होतो तेंव्हा शिरीष कणेकरांनी थापाड्या व खोटारडा असे दोन भाग केलेले आहेत त्यापैकी मी थापाड्या या गटात निश्चित मोडतो! कसा काय? तर त्यांनीच एक उदाहरण दिले आहे की, समजा एखादा मनुष्य कुणाला भेटायला सिटीबसने आला तर ...खोटारडा माणूस सांगेल की, 'त्याचं काय झालं, आज गाडी गरेज मध्ये कामाला निघाली...टूव्हीलर भावाने नेली...आणि taxi वेळेवर मिळाली नाही...रिक्षा देखील नाही..तेंव्हा बसने यायला लागले...'यात तो खोटे बोलत असतो आणि आपल्याकडे गाडी,
.टूव्हीलर आहे, आणि taxi रिक्षाने यायची आपली ऐपत आहे, आणि आज आगदी नाईलाजाने बसने यायला लागले हे त्याला दाखवायचे असते!
२     "थापाड्या"  हा खोटं बोलायचे म्हणून बोलतो!
उदा: समजा एखाद्या मनुष्याला विचारले, 'आज टू जेवण काय केलेस?' तेंव्हा या थापाड्या व्यक्तीने जर
'वरणभात' खाल्ला असेल ते तो 'पिठलेभात' असे सांगेल! वास्तविक त्यात असा काय फरक आहे? किंवा दर्जात काय फरक आहे? पण खोटं बोलायचे म्हणून बोलणारा तो थापाड्या!
माझ्या बाबत हे होते कारण मी जर 'अलका' ला 'लालबाग परळ' सिनेमा पहिला तर मी तो 'नीलायम' ला पहिला असे सांगेन यात दर्जाचादेखील, तिकीटाचाही फरक नाही! असो.
आज पाऊस पडत होता तेंव्हा जोशी सर पेटी घेऊन आणि सचिन ढोलके घेऊन बसला असता, जोशी सरांनी दोन मिनिटे कोणकोणत्या रेल्वे लाईन वर कोणकोणती गाणी गातात हे साभिनय करून दाखवले! तेंव्हा त्यांच्याकडून हि कला शिकून घ्यावी म्हणतो!
निदान घरून काही मिळो न मिळो उपाशी तरी मरणार नाही! सरांना 'फ्री टाईम' कधी असतो ते विचारून घ्यायला लागेल एकदा!


नमस्कार,
तुम्हाला इतक्या सर्व जाणिवा आहेत, भावना वाटतात पण तुम्ही त्या स्वतः जितक्या समजू शकता पण त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोचवत नाही, तर काय उपयोग?
अजून एक सांगायचं होतं की नात्यांमध्ये जो कडवटपणा वाटतो तो जर कमी करायचा असेल तर काही काम त्यावर करायचं असल्यास बघा. empathy  हा जो प्रकार आहे, स्वतःच्या आईने त्या त्या वेळी जे decision  घेतले (जे तुम्हाला पटले नाहीत) ते कदाचित चुकीचे असतीलही! परंतु तिचे भावनिक चढ-उतार, तिच्या insecurities , तिचा एकटेपणा हा कधी समजून घेतला आहे का? तिला कुणाचा आधार आहे? मोठा मुलगा (ज्यावर आया खूप भिस्त ठेवतात) आधार देत नसेल तर तिची मानसिक अवस्था काय झाली असेल? तर if you empathize, the bitterness may so down! please give it a try!
आपण याविषयी बोलूया.
तुमचा नवीन profession चा choice खूप आवडला!!
 

वैशाली मॅडम


No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....