Monday, 1 February 2010

AVINASHOGALE चषक माझा page 11/पेग ११



रानोमाळ पळून गेलेले गुंड
पोलीस गेल्यावर परत येतात
आणि तासाभरात भट्टी जमवून
पहिल्या धारेची काढून देतात

माझा आणि ‘ड्राय-डे’चा
छत्तीसाचा आकडा आहे
त्या दिवशी रस्ता सरळ
पण माझा पाय वाकडा आहे

ते प्रचंड धड कसे
उन्मळून पडले होते
घोटभर झाली जास्त, आणि
हे अघटित घडले होते

लोकांच्यात वावरतांना मी
माझा वास लपवत वावरतो
कुणी जास्त जवळ आलं की
माझ्यातला मी बावरतो

परवा एक तळीराम गुत्त्यात
आपली टोपी शोधत राहीला
कसं सांगू त्याला रोटीऐवजी
मी टोपी तोडताना पाहिला

प्रत्येकानं सांभाळायला हवी
आपापली बाटली
चवीचवीनं प्यावी, जेव्हा
हवीहवीशी वाटली

त्यावेळी नशाराणी
कशी हरलेली होती
पहाट होऊन सुद्धा बाटलीत
थोडी उरलेली होती

गटारी अमावस्येच्या दिवशी
ते पितात आणि लोळतात
नंतर मात्र श्रद्धापूर्वक
श्रावण महिना पाळतात

इथे प्रत्येकाला वाटतं
आपण किती शुद्धीवर
काही आहे का उपाय
तळीरामांच्या बुद्धीवर?

चषकात मला ‘रम’ताना
एवढेच कळले होते
पिण्याने दिला दिलासा
जिण्याने छळले होते

No comments:

Post a Comment