Monday, 16 August 2010

दोन दिवस : नारायण सुर्वे

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

संकलन : प्रवीण  कुलकर्णी

सत्य :: नारायण सुर्वे

तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .
पलिकडे खड़खड़नारे कारखाने
खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने
मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र
काटे ओलांडित चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ
खपत होतो घरासाठीच .....
विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर
तुझ्या खांद्यावर ---
तटतटलीस उरी पोटी
तनु मोहरली गोमटी
एक कौतुक धडपडत आले ; घरभरले
हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी
वाकलीस खणानारळांनी .

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन
पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन
कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .

'नारायणा' - गदगदला.
'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला .
' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा '
गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .
तीच्या ओठावर ओठ टेकवून
बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,
तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..

हंबरून वासराले चाटती जवा गायं : नारायण सुर्वे


हंबरून वासराले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..
आया बाया सांगत व्हत्या,व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा
पीठामंदी…..पीठामंदी
पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय..
तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..
कण्या काट्या वेचायला मायं जाई रानी
पायात नसे वाहन तिझ्या,फिरे अनवाणी
काट्याकुट्या…रं काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायं
तवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं… दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..
बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनं
बास झालं शिक्षाण आता,होऊदे हाती कामं
आगं शिकूनं शानं…गं शिकूनं शानं
शिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..
दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बापं
थरथर कापे अन् लागे तिले धापं
कसा ह्याच्या…रं कसा ह्याच्या
कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं
तवा मले गायीमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..
नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी
नं भरल्या डोळ्यान…नं भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कवा पाहील दुधावरची सायं
तवा मले सायीमंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले……
गो म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा गं माये तुझ्या पोटी
तुझ्या चरणी…गं तुझ्या चरणी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुझं पायं
तवा मले पायामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं..


संकलक: प्रवीण कुलकर्णी

माणूस वाचणारा कवी


वेगवेगळे ग्रंथ वाचून विचारवंत होण्यापेक्षा माणूस वाचायला शिकणे आवश्यक आहे. कारण माणूस या शब्दाइतका पवित्र शब्द नाही. वास्तवाशी संवाद म्हणजे संघर्ष आणि संघर्षाचा संबंध संस्कृतीशी आहे. या संस्कृतीचा निर्माता माणूस आहे म्हणूनच माणूस प्रथम वाचला पाहिजे मगच ग्रंथ वाचले तरी चालतील,‘ या वास्तवतेची जाणीव करून देणारा आणि प्रत्येक कवितेतून सभोवतालच्या माणसांचे अंतरंग, त्यांच्या व्यथा, वेदना आणि कथादेखील आपल्या कवितेतून मांडणारा कवी म्हणजे नारायण सुर्वे!
असा हा आधुनिक लोककवी! लोककवी तुकाराम अनेक विद्वानांच्या प्रबंधांचा विषय बनतो तसाच हा लोककवी अनेकांच्या प्रबंधांचा आणि माहितीपटाचा विषय बनला आहे. आयुष्यात कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने जगणार्‍या नारायण सुर्वे यांच्या जीवनावरील माहितीपट फोर्ड फाऊंडेशनने २३ लाख रुपये ख्रर्च करून तयार करावा हाही एक चमत्कारच म्हणावा लागेल.
फोर्ड फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि ख्याल ट्रस्टने ‘नारायण गंगाधर सुर्वे‘ या नावाने सुमारे ४५ मिनिटांचा एक माहितीपट तयार केला आहे. शांता गोखले यांची पटकथा, अरुण खोपकर यांचे दिग्दर्शन आणि किशोर कदम यांनी अभिनय केलेला हा चित्रपट म्हणजे सुर्वे यांच्या एकूण कवितेच्या प्रवासाचा धावता आढावा घेण्याचा केलेला एक असफल प्रयत्न म्हणावा लागेल.
आपला जन्म नेमका कधी, कुठे आणि कोणत्या आईच्या पोटी झाला याची कोणतीही जाणीव नसलेला आणि तरीही या जगातून गेल्यावर आपले नाव राहणारच या सार्थ अभिमानाने काव्यामध्ये आपल्या हृदयाचा पीळ उलगडवून त्यात जीव ओतणारा कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा आपल्याला परिचय होतो. गिरणीच्या दारावर गंगाराम सुर्वे यांना सापडलेला बेवारशी पोर त्याच्या अज्ञात मातेने नाळ कापून जगाच्या पाठीवर अंधारात भिरकावून दिल्यावर गिरणीच्या संस्कृतीशी त्याच ओल्या नाळेने जोडला गेला, वाढला आणि गिरण संस्कृतीशी नाव जोडून मोकळा झाला. कळू लागले त्याच वयात हातात डबा घेऊन गिरणीत हरकाम्या म्हणून जाऊ लागलेल्या नारायणला या गिरणगावातील संस्कृतीनेच मोठे केले. साधा गिरणीतील हरकाम्या पोरगा सभोवतालच्या वातावरणात मोठा होत असतानाच कधी राजकीय चळवळीत उतरला हे त्याला देखील कळले नाही. त्याच्या कवितेत हेच सतत जाणवत राहिलं आणि जाणवत राहिलं ते सध्या हरवत चाललेलं संवेदनक्षम माणसाचं जीवन!
‘प्रत्येकवेळी कोणतीही गोष्ट ठरवून झाली नाही पण दरवेळी प्रत्येक गोष्ट जमत गेली बुवा‘ अशी प्रांजळपणे कबुली देत आपल्या आयुष्याची ओळख करून देणार्‍या नारायण गंगाराम सुर्वे यांना तरी कुठे ठावूक होतं की आपण इतके ‘ग्रेट‘ होऊ. गिरणी कामगार ते शाळेतला शिपाई आणि त्या शिपायापासून शिक्षक अशी स्थित्यंतरे जीवनात आलेल्या नारायणच्या कविता अनेक प्रस्थापितांनी धुडकावून लावल्या होत्या. जीवनातल्या प्रत्येक स्थित्यंतरात तो आजूबाजूचा माणूस वाचायचा प्रयत्न करीत होता. कधी त्याला डोंगरावर शेत असलेल्या आणि डोक्यावर कवळाचा भारा घेऊन जाणारी कातकरी बाई दिसली तर कधी मास्तरांना त्यांचंच नाव आपल्या पोराच्या बापाच्या जागी लिहिण्याची गळ घालणारी पण मुलाला मोठं करण्याची, चार बुकं शिकविण्याची जिद्द उराशी बाळगणारी शरीरविक्रय करणारी महिला भेटली. कधी त्याला विदेशात पैसा कमविण्यासाठी गेलेल्या आपल्या धन्याला ‘तेव्हढं पत्रात लिवा‘ सांगून त्याचा आपल्यावर असणारा विश्वास सार्थ ठरविणारी गृहिणीही भेटली. स्वतः केवळ व्ह. फा. म्हणजेच व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकलेल्या कवीच्या कविता विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतात हा चमत्कार केवळ नारायण सुर्वे यांच्याच बाबतीत घडू शकतो.
जीवनातील असा चमत्कार सुर्वे यांच्या आयुष्यात नेहमीच घडत आला आहे. ‘डोंगरी शेत माझं गं‘ हे काव्य त्यांनी लिहिले खरे पण या काव्याचा जनक तेच आहेत हे सार्‍या महाराष्ट्राला कळण्यासाठी बराच काळ जावा लागला. डाव्या चळवळीमध्ये शाहीर अमरशेख यांनी हे गाणं जेव्हा ओठात खेळवलं आणि त्यांच्या कलापथकातील सुबल सरकार यांनी ते नृत्याद्वारे सादर केले तेव्हा नारायण सुर्वे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. त्या काळी गाजलेल्या या गाण्यावर जेव्हा ध्वनिमुद्रिका निघाली तेव्हा अनेक प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या.
अर्थात सुर्वे यांना पद्‌मश्री पुरस्कार मिळाला तेव्हादेखील याचीच पुनरावृत्ती झाली होती आणि तोही चमत्कार त्यांनी अनुभवला आहे. त्यांचे समकालीन असणार्‍या एका ज्येष्ठ नाटककाराने सांगितलेली आठवण अशी की, नारायण सुर्वे तेव्हा आपल्या कविता घेऊन प्रस्थापितांकडे जात असत, तेव्हा त्यांच्या अपुर्‍या शिक्षणाकडे आणि साध्या राहणीमानामुळे नाक मुरडणार्‍यांची संख्या काही कमी नव्हती. कै. विनायक भावे यांच्याकडेही सुर्वे अनेकदा आपल्या कविता घेऊन येत असत, पण मानवी स्वभाव कधीही न वाचलेल्या आणि इतरांच्या लिखाणाचे अनुकरण करण्यातच धन्यता मानणार्‍या भाव्यांना सुर्वे यांची कविता म्हणजे उघड्या गटारातील घाण वाटायची. भावे तेथेच राहिले आणि सुर्वे यांची कविता मोठी झाली, असे त्या नाटककाराचे म्हणणे आहे. सुर्वे यांनी प्रस्थापितांशी दोन हात केले ते आपल्या कवितेच्या माध्यमातून. त्याकाळी कविता ही केवळ कल्पनेवरच असायची त्याला सुर्वे यांनी छेद दिला. मर्ढेकरांना उद्देशून त्यांनी लिहिलेल्या कवितेमधून त्यांनी या कल्पनाविष्काराला छेद दिला. प्रस्थापितांच्या घरी आणि त्यांच्या मेळाव्यात जाऊन आपली कविता सादर करण्याचे धार्ष्ट्य त्यांनी दाखविले. सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला अभिनव प्रकाशन या डाव्या चळवळीशी संबंधित असलेल्या प्रकाशन संस्थेने. ‘ऐसा गा मी ब्रह्म‘ या पुस्तकासाठी त्यांच्या हितचिंतकांनी वर्गणी जमवून अभिनवच्या वा. वि. भट यांना प्रकाशनासाठी लागणारे पैसे दिले. हाही या प्रांतातला एक चमत्कार म्हणावा लागेल. अर्थात कवी म्हणून मान्यता मिळाल्यावर सुर्वे यांनी प्रस्थापितांच्या अन्य प्रकाशन संस्थांकडे आपली दुसरी पुस्तके सोपवली हा भाग व्यवहाराचा झाला.
सुर्वे यांचे बालपण ज्या वस्तीत गेले ती वस्ती, तो गिरणगाव आता नामशेष झाला आहे. त्यांची कविता ज्या संस्कृतीशी जोडली गेली ती संस्कृतीही हळूहळू लोप पावू लागली आहे. ‘मी कामगार आहे, एक तळपती तलवार आहे,‘ असे सांगणार्‍या सुर्वे यांनी मुंबईच्या गिरणीची लावणी पेश करून गिरणी कामगाराच्या जीवनाचा क्रम सादर केला आहे. मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात व्यग्र असलेल्या चाकरमान्याची व्यथा ‘माझी मैना गावावर राहिली‘ ही छक्कड सादर करून कष्टकर्‍यांचे जीवन स्वतः जगलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मांडली तर कळू लागल्यापासून धागा कसा धरायचा आणि बॉबीन कशी भरायची हे शिकलेल्या नारायण सुर्वे यांनी ‘सात वाजता सकाळी, भोंगा वाजवी भूपाळी‘ ही लावणी सादर करून गिरणगावाचे यथार्थ दर्शन घडविले आहे. आजही अनेक वयोवृध्द गिरणी कामगारांच्या ओठावर ही लावणी आपसूक येते आणि त्यांचे पाण्याने भरलेले डोळे बंद गिरण्यांच्या दाराकडे वळतात. आता भोंगा बंद झाला आणि कामगारांच्या पाळ्यादेखील बंद पडल्या पण सुर्वे यांची ही लावणी इतिहासात गाजून गेली.
याच गिरणीच्या आयुष्यात त्यांना त्यांची जीवनसाथी मिळाली आणि तिथेच त्यांना मार्क्सही भेटला.
‘असाच एकदा मोर्चात मार्क्स मला भेटला‘ असे सांगत आपण कम्युनिस्ट चळवळीशी कसे बांधले गेलो याचे वर्णन करणार्‍या सुर्वे यांना याच कम्युनिस्ट चळवळीने सांस्कृतिक चळवळीची उपेक्षा केली याचे वैषम्य वाटते. या देशातील सांस्कृतिक जडणघडणीकडे कम्युनिस्ट चळवळीने म्हणावे तेव्हढे लक्ष दिले नाही अन्यथा नारायण सुर्वे यांच्यासारखे अनेक कवी-कलावंत आजही डावी चळवळ फोफावण्यासाठी धडपडले असते. त्यांच्या ‘मार्क्स‘ कवितेत अखेरीस ते म्हणतात, ‘मला गर्दीत पाहून मार्क्स म्हणाला काय कविता-बिविता करतोस वाटते. मलादेखील गटे आवडायचा.‘ या वाक्यातच चळवळीकडून होणारी सांस्कृतिक उपेक्षा लक्षात येते. सुर्वे यांच्या ‘माझी आई‘ ही कवितादेखील अशीच नोंद घेणारी आहे. आपल्या जन्मदात्रीचा पत्ता माहीत नाही पण बेवारशी असलेल्या एका अनाथाला पोटच्या पोराच्या मायेने उराशी घेऊन नंतर त्याचा प्रतिपाळ करणार्‍या त्या मायेचे वर्णन करणारी कविता सुर्वे जेव्हा सादर करतात तेव्हा डोळ्यातून पाणी न येणारा हृदयशून्य माणूस सापडणे कठीण! शिक्षकाच्या भूमिकेत असतानाही केवळ मुलांवर पाठ्यपुस्तकी संस्कार करण्यापेक्षा त्यांना माणूस वाचायला लावणारे सुर्वे आपल्या जीवनाचे सार कशात आहे, हेही मुलांना शिकवितात तेव्हा त्यांच्यातील माणूस म्हणून असणार्‍या संवेदना मनाला भिडल्याखेरीज राहत नाहीत.
प्रसाद मोकाशी

31/05/2010

खरं तर हजार हात असते तर हजार विषय आणि घटनांवर किंवा विचारांवर लिहिता आले असते. मागच्या वेळी माझा फोकस विशेषत: आर्थिक सुरक्षिततेवर होता. आजही नाही असे नाही, पण मी इथे येताना आई म्हणाली, थांब, जाऊ नको, आता बंद कर! पण मी फक्त आज पितो उद्यापासून बंद असे सांगत होतो. त्यावर ठाम होतो. त्यावेळी भावाने मॅडम काय म्हणतात ते पहा असे सांगितले, इथे आलो नसतो तर कदाचित थांबलोही असतो पण तात्पुरता. हे आठवायचे कारण म्हणजे आज सकाळी योगच्या वेळी दरीची घडी घालताना ती माझ्याकडून चुकीची घातली गेली. त्यावर नीलकंठ सरांनी व्यवस्थित घालून दिली व घडी घालताना त्यांनी विचारले, "क्यों प्यारे, प्रोग्राम भूल गये?"यावर हसून म्हणालो, "लागता तो ऐसाही ही!"
यानंतर आर. इ. टी. च्या सेशनमध्ये तुम्ही माझ्या वहीतील मराठीतील अतार्किक समजुती इतरांना देण्याविषयी सांगितले! वास्तविक मी इंटरनेट वर तुरळक वगळता याविषयी कांही वाचले नाही किंवा लक्षही दिले नाही! पण कितीही नाही म्हटले तरी कांही ना कांही लक्षात राहातच असते. पण त्याचा कृतीत आणण्याचा सराव नसतो, तो व्हावाच लागतो, नव्हे करावाच लागतो!
तसेही माझ्या आयुष्यात कांही फार मोठ्या आणि खळबळजनक अशा घटना नाहीत. (हे मिनिमाइजेशन नाही!)
काही असले तरी त्याचा फार त्रास नाही. पुढेही फार कांही घडण्याचा संभव नाही मात्र, ज्या छोट्या घटना किंवा प्रसंग असतात त्या तरी कुठे नीट हाताळता येतात? माहिती हि बाबच गौण आहे. {याबाबत माहिती आणि ज्ञान आणि माझा वेडेपणा याविषयी एकदा सविस्तर लिहायचे आहे} पण जी माहिती आहे तिचा मी वापर करतो का ? किंवा कसा करतो? याबाबत एक गोष्ट आहे टी सहज आठवली...ती अशी....
एका जंगलात एका साधू महाराजांचा आश्रम असतो. तिथे ते एकटेच ध्यान-साधना करीत असतात. ते एका कुटीरात वास्तव्य करीत असतात. एके दिवशी त्यांना एक सुंदर, आकर्षक, आणि बोलणारा असा एक दिव्य पक्षी सापडतो. ते त्याला पाळतात. पण ते इकडे असल्याने आणि ध्यान धारणेत चार चार दिवस बसत असल्याने ते त्याला व्याध (शिकारी,पारधी) यांच्या जाळ्यात सापडू नये म्हणून ज्ञान(?)देतात.
'शिकारी येईल...दाणा टाकेल...जाळे टाकेल..अडकशील...'
पक्षी हे तोंडपाठ करतो...
'शिकारी येईल...दाणा टाकेल...जाळे टाकेल..अडकशील...'
एके दिवशी साधू महाराज ध्यान करण्यास निघून जातात. तेंव्हा तेथे खरेच शिकारी येतो! जाळे पसरतो. व वाट पाहत बसतो.
आपला हा पक्षी एक एक दाणा टिपीत जाळ्याच्या दिशेने जात असतो पण जाताना मात्र म्हणत असतो...
'शिकारी येईल...दाणा टाकेल...जाळे टाकेल..अडकशील...'!!!

नमस्कार,
तुमचा Q.T.
वाचायला खूप मजा येते. I look forward. दोन्ही किस्से भारी!!!(गोष्ट+मुक्तांगण मधला)
इतका awareness
असलेल्या माणसाला सांगावं तरी काय? पण परत application हाही खूप मोठा विषय आहे. कारण आपण इथं time & again पाहतो की theory पाठ असून भागात नाही..शेवटी वर्तनातून दिसावं लागतं. इतरांना हे सहज सांगता येत नाही की सुरुवातीला सोपं करावं म्हणून असं सांगते की, start with -role नुसार तुम्ही responsibilities घ्यायला लागा. वर्तनात आपोआप एक routine व शिस्त येते. पण तुमच्या बाबतीत या गोष्टी धूसर आहेत. त्यामुळे ते सोपं करून सांगता येत नाही. असो.
तुम्हीच मला सांगा की, ret चे प्रत्यक्षात आणणं कसा करावं? आपण बोलू.
वैशाली मडम



28/05/2010

आज व्हॉलीबॉल खेळल्यानंतर सचिनने मनस्थितीबद्दल विचारले, मी म्हणालो, मी मॅडमशी बोललो त्यामुळे आता थोडा आत्मविश्वास आला आहे. आमचे हे बोलणे चालू असताना एक पेशंट अचानक तिथे आला व त्याने ऐकून दचकून विचारले, "अशा विषयावर मॅडम बोलतात?" मी म्हणालो, हे विषय त्यांच्यासाठी क्षुल्लक असतात. आपल्यासारखे शेकडो पेशंट दरवर्षी, वर्षाकाठी ते पाहत असतात, आपणच घाबरतो! 'मुक्तांगण' मध्ये तर यासाठी एक खास मॅडम आहेत. असो.
तर आज स्ट्रेस कमी झाल्यामुळे व विषय निघाल्याने मी मुक्तांगण मधील एक किस्सा लिहिणार आहे.
मुक्तांगण मध्ये मी तीस-या वेळी दाखल झालो तेंव्हा, पहिल्या आठवड्यात, दुस-या की तीस-या दिवशी जेवण करून येत असताना रमण देशपांडे यांनी मला, प्रवीण, तुला कुलकर्णी मॅडमनी बोलावले आहे. असे सांगितले. मी पहिल्याच आठवड्यात होतो. (तिकडे आठवडे असतात.) त्यामुळे साहजिकच जेवण करून {अनलिमिटेड!} करून झोपायच्या तयारीत होतो. डोळ्यांवर झोप खूप होती. मी नापसंती व्यक्त करत मॅडमच्या केबिनमध्ये गेलो. तिथे त्यांच्यासमोर कांही फाईल्स होत्या. त्यांनी मान वर न करताच, {अगदी बसा देखील न म्हणता} विचारले, तुम्ही मी विचारेन त्याला पटपट उतारे द्या. मला आकाशवाणीवर इंटरव्युला जायचे आहे.
मी म्हणालो, हुं...
त्यांनी पहिल्यांदा विचारले, "मी तुम्हाला मागील अॅडमिशनमध्ये भेटले होते ना?"
मी म्हणालो, "नाही"
त्यावर त्यांनी कांहीतरी नोटआउट करत ठामपणे सांगितले, हे काय? मी तुम्हाला कांही
सांगितले देखील होते. विसरलात का?

मी म्हणालो, "असेल कदाचित.."
त्यावर त्यांनी पटापट विचारण्यास सुरुवात केली, पहिला प्रश्न : तुम्ही गेल्या महिन्यात मिसेसना पुन्हा शिवीगाळ केलीत...
मी फाईलवर नजर फिरवली..त्यावर प्रवीण आकोसकर असे नाव होते! मी मडमची फिरकी घ्यायचे ठरवले. (मनातल्या मनात रमण देशपांडेवर चरफडत) मी म्हणालो, चुकलेच..
त्यावर त्यांनी सांगितले की, तुम्ही मिसेसना फक्त संध्याकाळी बीचवर नेण्याचे कबूल केले होते ना? सहकारी मिटिंग मध्ये बोलल्या त्या!
मी म्हणालो, "मला नाही कधी बोलली ती..बोलली तर नेत जाईन..!"
आता त्यांनी मला नीट निरखून (मान वर करून) पहिले!..
फाईलवर नाव पहिले..
व विचारले, "तुम्ही कुलकर्णी ना?" मी म्हणालो हो!
त्यावर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता..पण
डम तिथे 'अगर मनेजमेंट' शिकवतात!
त्यांना 'फ्ल
फोर ए' चा चांगला सराव असावा!
flash four "A"
A=accept
A=aware
A= analysis
A=action !!
मग त्यांनी शांतपणे फाईल्स जमवल्या. आणि मला सांगितले, "त्या प्रवीण अकोसकरला सांगा..पटकन येऊन जा म्हणून..
मी अजून कांही ऐकण्याच्या आधी उठून आलो!
नंतर बरेच दिवस माझे स्वतःशीच हसण्यात गेले. कारण आता कुणाची बायको?...मला कशाला बीचवर फिरायला घेऊन जायला सांगेल?सांगा पाहू? पण नावात साधर्म्य आणि एकंदर कामाचा व्याप आणि पसारा यामुळे कदाचित आणि रमणची चूक यामुळे मडमची गफलत झाली असावी!